Wednesday, October 10, 2018

हरिहर किल्ला / हर्षगड : नाशिक HARIHAR FORT

हरिहर किल्ला / हर्षगड : नाशिक HARIHAR FORT (२८ जुन २०१५ )



हरिहर / हरिहर

हरिहर किल्ल्याला भेट देऊन ३ वर्ष झाली .हरिहरला " हर्षगड" असे ही म्हणतात. समुद्रसपाटी पासून ३६७६ फूट उंच असा हा किल्ला सह्याद्रीच्या त्र्यंबक भागातील महत्वाचा किल्ला आहे !  मागील आठवड्यात फेसबुक वर हरिहर किल्ल्याचे फोटो पहिले आणि तेव्हा जाणवले की हरिहर किल्ल्याच्या  पायऱ्यांची छाप मनावर कायमची उमटलेली आहे. मराठ्यांचे शक्तिस्थान म्हणजे त्यांचे किल्ले ! मराठ्यांची शक्तिस्थाने कमकुवत करण्यासाठी  इंग्रज गडावर जाणऱ्या पायऱ्या आणि वाटा तोफगोळ्यांनी उडवित असत  ! इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्स हा हरिहर गडाच्या कोरलेल्या पायऱ्या पाहून त्यांच्या प्रेमात पडला आणि त्याने त्या  तोफगोळ्यांनी  न उडविण्याचा निर्णय घेतला. इंग्रज तसेच निर्दयी माणसे त्यात त्यांनी ह्या वास्तूचा एक भाग जपला म्हणजे ती नक्कीच सुंदर असणार असे कुतूहल मनात होते. प्रत्यक्ष पाहिल्यावर त्या कश्या बांधल्या गेल्या असतील हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडेल आणि तो ही  हरिहरच्या प्रेमात पडेल हे नक्की ! एका दुर्गम सुळक्यावर मधोमध  आणि घुमावदार पायऱ्या कोरणे ही साधी बाब नव्हे ! 


हरिहर गडाच्या पायऱ्या 

टाके हर्ष गावातून दिसणारा धुक्यात लपलेला हरिहर गड 

आम्ही कसे गेलो ? 

दिनांक : २८ जुन २०१५ ! अभिनव , तुषार , शशांक , सचिन पवार , दशरथ , दिलीप आणि मी असे एकूण ७ जण शेवटची कसारा लोकल पकडून कसाऱ्याला उतरलो. अभिनवने एका खाजगी सुमोला बुक केली होती  ! कसारा - खोडाळा - निरगुडपाडा आणि टाके हर्ष असा आमचा मार्ग होता . कसाराहुन खोडाळ्याकडून त्र्यंबकेश्वर जाणाऱ्या मार्गावर हरिहर किल्ला येतो. अगदी आरामात गेलो तरी २ तासाच्या आत आपण टाके हर्ष ह्या गावी पोहोचतो . ह्या गावात रस्त्यालगतच एक प्राथमिक शाळा आहे . ह्या शाळेच्या पडवी मध्ये आपण विश्रांती करू शकतो . पहाटे लवकर ट्रेक सुरु कार्याच्या हेतूने आम्ही शाळेच्या पडवीमध्ये झोपायचे ठरवले पण खूप थंडी असल्याने कुणाचीही झोप पूर्ण झाली नसल्याचे आठवते. गाडी आणि गाडीचे चालक आमच्या सोबत टाके हर्ष ह्या गावी मुक्कामी राहणार आणि दुसऱ्या दिवशी  संध्याकाळी आम्हाला पुन्हा कसारा आणून सोडणार असे ठरले होते.


एका  थरारक वळणावर 



पाऊल  ट्रेकर्स 



ट्रेकला सुरुवात !

६.३० वाजता आम्ही ट्रेकला  सुरुवात  केली ! पावसाळी दिवस होते आणि नुकत्याच पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा आणला होता. गावकऱ्यांनी आम्हाला चहा दिला  आणि आम्ही पूर्ण ताजेतवाने झालो. गडावर जाणारी पायवाट पकडून आम्ही ट्रेक ला सुरुवात केली . मौज मस्ती करत कसा एक तास निघून गेला हे कळले ही नाही . आम्ही बऱ्यापैकी उंची गाठली होती पण अजूनही दाट धुक्यामुळे हरिहर गडाचा सुळका दिसत नव्हता ! थोड्याच वेळात धुके हळू हळू सरू लागले होते ! आम्ही एका पठारावर येउन पोहचलो होतो ! धुके सरल्यावर एक प्रचंड मोठा भारदस्त सुळका आणि त्या वर एक घळ दिसली . अचानक लक्षात आले की घळ  नसून त्या हरिहरच्या पायऱ्या आहेत ! आपणास जिथे जायचे आहे ते लक्ष प्रथमदर्शनी दिसल्यावरचा आनंद हा एक ट्रेकरच समजू शकतो.


प्रथम दर्शन 

धुके सरले आणि आम्हाला पायऱ्या दिसू लागल्या 
आपण नेहमी ऐकतो की स्वर्गात जाण्यासाठी पायऱ्या असतात. त्या दिवशी हरिहरच्या पायऱ्या आम्हाला तश्याच काहीश्या वाटत होत्या . सोसाट्याचा बेभान वारा , आजू बाजूला वाहणारे धुके , हिरवीगार डोंगररांग पाहून असे वाटत होते की  इथेच झोपडी बांधून कायमचे रहावे  ! फोटो मध्ये जसे पहिले होते त्या पेक्षा पायऱ्या जास्तच सुंदर दिसत होत्या . ज्याला इतिहासाची आवड नाही अश्या व्यक्तीलाही ह्या आवडतील असे स्वरूप ह्या पायऱ्यांचे आहे . पायऱ्या ७० - ८० अंशावर आहेत असे नेटवरील माहितीमुळे  समजते. जेव्हा आम्ही पायऱ्या जवळ पोहचलो तेव्हा मन थोडे धस्स झाले ! पाहताक्षणी त्या कठीण वाटल्या !  पण चढाई करिता पायऱ्या सोप्या आहेत . सुरक्षेसाठी पायऱ्याना  कोनाडे/ खोबण्या आहेत, त्यांना पकडून आपल्याला वर जाता येते ! पायऱ्या संपल्यावर आपल्याला  महादरवाजा हा दोन  बुरुजांमध्ये दिसतो ! आपल्याला एक गणपतीचीमूर्ती कोरलेली दिसते . ह्या पायऱ्या चढताना खूप संयमाने चढाव्या लागतील . पावसाळ्यात कोणताही धसमुसळेपणा धोकादायक  ठरू शकतो . 


अभिनव 

पुढेच  एक नैसर्गिक छत तयार झाले आहे आणि त्याला एक नेढे आहे ! त्या नेढ्याला वळसा मारून आपल्याला अजून एक घुमावदार पायऱ्या  मिळतात !येथे मात्र आपणास काळजी घ्यावी लागते ! आपल्या डाव्या बाजूस दरीच आहे असे समजा ! ह्या पायऱ्या  पार पडल्या नंतर अजून एक कमान दिसते आणि आपण डोंगर माथ्यावर येतो !पायऱ्यापासून गडमाथ्यावर येण्याचा अनुभव चित्तथरारक होता ! आम्ही सगळेच खूप खुश होतो !गड फिरण्य अगोदर आम्ही निवांत बसून वेगाने वाहणारे ढग आणि धुक्यांशी लपंडाव खेळत असलेली गावे पाहत होतो ! 
दशरथ 



गणपती  बाप्पा मोरया .. दरवाज्याजवळ  गडावरचा गणपती 

गड फिरायला तासभर वेळ लागतो .  आम्ही मात्र २ तास घेतले . गडावर आपणास पाच पाण्याची टाके , एक तलाव , मारुतीचे मंदिर आणि छोटे शंकराचे मंदिर दिसते . आम्ही जेवण हे तलावाजवळ केले .  नेहमी प्रमाणे या वेळी ही  चटपटीत पदार्थ होते ! पुढे गेल्यावर एक इमारत दिसते त्यात दोन खोल्या आहेत व त्यावर घुमटकर छत आहे. महादरवाज्याच्या विरुद्ध टोकाला पण छान निसर्ग सौंदर्य पाहता येते ! तेथे  चांगला वेळ गेला !

पाऊल  ट्रेकर्स 

परतीचा प्रवास : 

 परतीचा प्रवास हा जलद झाला. खाली उतरताना मात्र थोडीशी भीती वाटली. पूर्ण अंग डाव्याबाजूच्या भिंतीला ठेवूनच उतरत होतो . पावसामुळे वाट पण निसरडी झाली होती . आमच्या मनातील भीती आमच्या पुढे असणाऱ्या एका गावकरी  माणसाला मात्र नक्कीच नव्हती . डोंगरावरील पळसाची पाने एकत्र करून त्यांने त्याचे भारे आपल्या डोक्यावर ठेवले होते . रोजचीच वाट असल्याने तो भले मोठे भारे घेणून निवांत उतरत होता . हरिहर गडाचा आकर्षणबिंदू म्हणजे कातळात कोरलेल्या पायऱ्या ! आम्ही भल्या पहाटे ट्रेक सुरु केल्याने आम्हाला पायऱ्या चढताना गर्दी नव्हती . उतरणीच्या वेळी अनेक ग्रुप तिथे आले होते . त्या पायऱ्या उतरायलाच आम्हाला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ गेला . योगायोग असा कि माझा मामे भाऊ अमितेश मला भेटला ! अमितेश मला एका आठवड्यापूर्वीच म्हणाला होता की तो हरिहर किल्ल्यावर जाणार आहे . आणि योगायोग असा की आमची भेट परतीच्या मार्गावर हरिहर किल्ल्यावरच झाली . त्याला भेटून पण मस्त वाटले ! साधारण दीड तासात आम्ही टाके हर्ष ला पोहोचलो आणि पुन्हा एकदा गडाचे दर्शन घेऊन कसारा गाठला . 
उतरणीच्या वेळेस असलेली हा गर्दी 


पाऊल टीम : शशांक , अभिनव , सचिन पवार , दिलीप , दशरथ , तुषार आणि नरेंद्र


नेढे 

एका अवघड वळणावर 

खोबणी असलेल्या पायऱ्या 


तलाव आणि मंदिर  


हर हर  महादेव 


हनुमानाचे मंदिर 

धुक्याची चादर 

शंभू महादेव 

गोल घुमटाकार इमारत आणि टाक्या 

गडावर पाण्याच्या ५ टाक्या आहेत 


अमितेश आणि मी .... निव्वळ योगायोग !

सगळे कसे निवांत !!!



तुषारने सर्व काही व्यक्त केले आहे 



तळ्याकाठी 



शशांक 



पवार साहेब 



पेटपूजेचे सामान 

Saturday, March 10, 2018

चावंड किल्ला , जुन्नर , पुणे / Chavand Fort , Junnar Pune


चावंड किल्ला , जुन्नर , पुणे


जुन्नर :

जुन्नर ! शिवरायांच्या जन्मभूमीमुळे पावन झालेल्या जुन्नरचा इतिहास आपल्याला सातवाहन काळात नेऊन ठेवतो . अनेक किल्ले , लेण्या , मंदिरे , पुरातन व्यापारीरस्ते आणि पर्यटन स्थळे आपल्याला ह्या परिसरात पाहायला मिळतात. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधायच्या झाल्या तर इतिहासातील सोनेरी कालखंडाचे पुरावे येथे आजही उभे आहेत. जुन्नर म्हणजे सातवाहन काळाचे जीर्णनगर होय. जुन्याकाळी कल्याण बंदरावर उतरलेला माल नाणे घाट मार्गे  येऊन जुन्नरला येत असे आणि तो जुन्नर मार्गे पैठणला जात असे . पैठण म्हणजे सातवाहनकालचे "प्रतिष्ठान". पैठण तेव्हा सातवाहनांची राजधानी होती. कल्याण-नाणे घाट-जुन्नर-नगर-पैठण हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग होता. जुन्नरच्या डोंगराळ भागातून येणार्या या व्यापारीमार्गाचे संरक्षण व्हावे आणि लूटमारीपासून बचाव व्हावा म्हणून त्या त्या वेळच्या राजवटींमध्ये भैरवगड, जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, ढाकोबा, शिवनेरी, नारायणगड, शिंदोला, रांजणगड, कोंबडकिल्ला यासारख्या किल्ल्यांची निर्मिती झाली.(संदर्भ : जुन्नर तालुकचा इतिहास) . नाणेघाटाच्या रक्षणासाठी म्हणून जीवधन - हडसर - शिवनेरी आणि चावंड किल्ल्यांचा उपयोग होत असे. म्हणूनच " नाणेघाटाचे पहारेकरी " म्हणून ह्या किल्ल्यांना ओळखले जाते.

मुख्य दरवाज्यावर कोरलेले गणेश शिल्प आणि भिंतीवर कोरलेला गणपती


चावंड किल्ला आणि आम्ही : 

होळीमुळे  लागून सुट्ट्या आल्या होत्या. काही तरी मोठा प्लॅन करावा असे ठरले आणि सर्व मोठे प्लॅन जसे केले तसे फिस्कटले. दिवस जमले नाही तरी किमान दिवस तरी ट्रेकला जायचे असे ठरले आणि राहूलने चावंड किल्ल्याबद्दल सांगितले. गड सोपा आणि एका दिवसात करून येण्यासारखा होता. त्यामुळे सर्व तयार झाले. "नाणेघाट-जीवधन - हडसर - शिवनेरी आणि चावंड" या जुन्नरमधील  ठिकाणांना "फेमस 5 " असे म्हणतात.  माझा एक वैयक्तित हेतू असा होता की  फेमस 5 संचातील चावंड किल्ल्याला मी भेट दिली नव्हती म्हणून मी ह्या ट्रेक साठी एका पायावर तयार झालो. सर्व नियोजन राहुल आणि सोनलने केले . चावंड किल्ल्याला आम्ही रविवारी भेट देणार होतो.  योगायोगाने रविवार दिनांक मार्च २०१८ ला तिथीप्रमाणे शिवजयंती होती. शिवजयंतीच्या दिवशी कोणत्याही किल्ल्याला भेट देणे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट होती. शिवरायांविषयीचा आदर आणि गडकिल्ल्यांची आवड ह्या एकमेकांना पूरक गोष्टी आहेत. गडकिल्ले फिरताना आणि पाहताना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. सोबत मिळतो तो आनंद भटकेगिरीचा !
कल्याण वरून रात्री १०.३० ची "कल्याण - पाथर्डी " ही  नगरला जाणारी लालगाडी पकडली. आळेफाट्याला उतरून तिथून लगेच आम्हाला नारायणगाला जाणारी एस टी मिळाली . नारायणगावात मात्र आम्हाला जुन्नरला जाण्यासाठी पहिली  एसटी पहाटे .३० ची होती . त्यामुळे नारायणगावी पहाटेच चहा आणि मसाला दूध पिऊन थोडा आराम केला. तिथून पहाटे .३० ची जुन्नर गाडी पकडून जुन्नरला आलो . पहाटेचे वाजले होते आणि शिवजयंतीचा उत्साह खूप होता . चौकाचौकात शिवजयंती साजरी केली जात होती . मिरवणुकीची तयारी भल्या पहाटे चालू होती . समोरच दिसणारा शिवनेरी किल्ला रोषणाईने उजळून निघाला होता. जुन्नर चौकातील महाराज्यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन एका खाजगी रिक्षाने चावंडवाडीस पोहोचलो. कल्याण- आळेफाटा - नारायणगाव- जुन्नर - चावंडवाडी ह्या प्रवासाचे मोल खूप होते कारण पूर्वी खर्चासाठी आमच्याकडे ठराविक रक्कम असायची त्यामुळे बजेट मध्ये गडवारी करायची म्हणजे एसटीचा प्रवास सोईस्कर असायचा .  खूप दिवसांनी असा टप्प्याटप्याचा एसटी  प्रवास केला होता त्यामुळे आमच्या सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.


चावंड किल्ला प्रवेशद्वार 

चावंडवाडी ते चावंडचा किल्ला  :

चावंड किल्ल्यावर चामुंडा  देवीचे मंदिर आहे.  चावंड हे नाव चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहे. कदाचित देवीच्या नावामुळेच किल्ल्याला चावंड हे नाव मिळाले असावे. चुंड - हे निजामशाही नाव आहे. प्रसन्नगड-हे शिवाजी महाराजांनी ठेवलेले नाव आहे . आम्ही अगदी पायथ्याजवळ उतरलो आणि लागलीच ट्रेक सुरु केला. सकाळी वातावरण प्रसन्न होते. पक्षी निरीक्षणासाठी खूप चांगला वेळ होता. अनेक पक्ष्यांचे आवाज कानात गुंजत होते आणि अनेक ओळखीचे आणि अनोळखीचे पक्षी आम्हाला वाटेमध्ये दिसत होते. गडावर जाणारा मार्ग चांगला आहे आणि एखद्या उंचावर असलेल्या मंदिरावर जश्या पायऱ्या बनवलेल्या आहेत या प्रमाणे अगदी गड्माथ्यापर्यंत येथे पायऱ्या वनखात्यांने बनवल्या आहे. ह्या गडावर जाणाऱ्या पायऱ्या ब्रिटिशांनी  सुरुंग लावून फोडल्या होत्या. त्यामुळे मध्यभागी रेलिंगची वाट सुरू होते. रेलिंगमुळे चढाई अतिशय सुरक्षित झाली असून ज्यांनी हे काम केले त्यांचे सर्व ट्रेकर्सनी  आभार मानले पाहिजे असे मला वाटते. मध्येच वाटे मध्ये जंबुरका प्रकारातील एक छोटी तोफ जमिनी मध्ये पुरली आहे. रेलिंग नसताना आधाराकरिता ती तोफ जमिनीत पुरली असावी असे वाटते. पुढे लवकरच दगडी पायऱ्या लागतात ज्या उंचीने थोड्या मोठ्या आहेत. त्या पार केल्या की  आपण थेट पहिल्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो.  प्रवेशद्वार त्या पायऱ्यांच्या काटकोनात बांधलेले आहे. त्यामुळे खालून वा अगदी पायऱ्या चढून आले तरीही प्रवेशद्वार दृष्टीस पडत नाही. हा बुरूज प्रवेशद्वाराचे रक्षण करतो. प्रवेशद्वारावर दगडी कमानीतच गणपती कोरलेला आहे तसेच भिंतीवर हि गणपतीची कोरीव मूर्ती आहे .


रेलिंगचा मार्ग 

गडमाथा :

गडमाथा विस्तीर्ण आहे आणि गडावर खूप पाण्याच्या टाक्या आहेत. सर्वप्रथम काही पडलेल्या  वाड्यांचे अवशेष पाहून आम्ही गडावरील सर्वोच्च ठिकाणावर गेलो जिथे चामुंडा देवीचे मंदिर आहे . मंदिराची बांधणी आता नव्या पद्धतीने केली असली तरी मंदिर हे खूप जुने आहे .आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते. देवीचे दर्शन घेताना खूप छान वाटले . मंदिर कसे ही असो देवाच्या गाभाऱ्यात मनःशांती मिळतेच .  ह्याच मंदिराच्या पाठी आम्ही सकाळचा नाश्ता केला आणि आमच्या फसलेल्या प्लॅनची मजेदार चर्चा केली . सरतेशेवटी आपण चावंड किल्लावर पोहोचललो आणि आता खूप चांगले पाहण्यास मिळणार ह्यामुळे  आम्हाला जास्त आनंद होत होता. अगदी थोडा वेळ  विश्रान्ती करून आम्ही उर्वरित किल्ला पाहण्यास निघालो.
 
किल्ल्यावरील पाण्याचा साठा आणि भग्न वाड्यांचे अवशेष पाहून असे वाटते की  ह्या किल्ल्यावर अनेक माणसाचा राबता असणार. वर्षभर किल्ल्यावर पाण्याची अजिबात टंचाई होत नसावी असे दिसते. सप्तमातृका कुंडांकडे जाताना त्या वेळेची दगडी शौचालये पाहायला मिळतात . पुढे गेलो तर सप्तमातृका कुंड दिसतात. पाण्याची टाकी एकाच ठिकाणी आढळून येतात . किल्ल्यावर जाऊन हे कुंड अजिबात चुकवू नये असे आहेत. सप्त मातृका म्हणजे- ब्राम्ही, महेश्र्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणि आणि चामुंडा. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ मनाली जाते. या कुंडाच्या पहिल्या टाक्याला प्रवेद्वार आहे आणि त्या प्रवेशद्वारावर ही सुंदर गणपतीचे शिल्प कोरले आहे. थोडे खाली उतरून गेलात तर आपल्याला गुहा दिसतात . धान्य किंवा दारुगोळा ठेवण्यासाठी ह्याचा उपयोग होत असावा असे वाटते. येथे एक चोरवाट ही आहे जी सध्या बंद केली गेली आहे . सह्याद्रीच्या रांगेतील आसपासच्या पर्वताचं भव्य मनोरम दृश्य ह्या ठिकाणावरून पाहिल्यावर मन प्रसन्न होते . माणिकडोहचा विस्तृत पाण्याचा साठा आणि त्याच्या कुशीत वसलेली छोटी छोटी गावे आपल्याला सुखवस्तू वाटतात. मोठ्या जलाशयाच्या मध्ये भागी एक इवलीशी मच्छिमाराची होडी वाहत आहे हे पाहून आपण आपले डोळे बंद करू शकत नाही. हे पाहून आपल्यालाही त्या होडीतून सफर करावी असे नक्की वाटते.


धान्याची कोठारे आणि सप्तमातृका कुंड पाहून आम्ही पुन्हा वरच्या बाजूला आलो आणि तळ्याकाठी असलेले एक भग्न मंदिर पाहिले .पुरातन अवशेष आणि दगडावर केलेले नक्षीकाम केवळ पाहत राहावे असे आहे. अनेक वर्ष मेहनतीने केलेलं काम आज भग्न अवस्थेत होते . मंदिराचे अवशेष पाहून मला थोडेसे दुःख झाले . तळ्याकाठी कोरीव मंदिर आणि त्यात चाललेली शंकराची आराधना हे सुंदर दृश्य माझ्या डोळ्यासमोर आले होते . कल्पना कधी कधी सुंदर वाटतात पण सध्यस्थितीत मंदिराची पडझड झाली आहे हे सुखकारक नक्कीच नाही.

येथून पुढे गेलो की अनेक छोट्या मोठ्या पाण्याच्या टाक्या दिसतात . आता मार्च महिना सूरु होत असताना काही टाक्या कोरड्या झाल्या आहेत आणि काही टाक्यामध्ये पाणी आहे. असे लक्षात येते की  गड सर करत असताना. सोबत पाणी असणे आवश्यक आहे. कारण गडावर जरी पाण्याच्या टाक्या असल्या तरी त्यातील पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे. अनेक पडीक वाडे पाहत आणि गडाला जवळ जवळ प्रदक्षिणा मारून आम्ही पुन्हा मुख्यद्वाराजवळ पोहोचलो. किल्ल्याच्या तटबंदीला पण जात जात भेट दिली . पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराशी येऊन आम्ही थांबलो आणि थोडी विश्रांती घेऊन परतीचा प्रवास सुरु केला आणि अगदी २० मिनिटामध्ये पायथ्याशी पोहचलो .

सप्त मातृका 

परतीचा प्रवास : 

सोनल आणि राहुल दोघांनी सर्व नियोजन केले म्हणून त्यांचे आभार . अनिकेतराव रोकडे ह्यांनी ह्या वेळी खजिनदारपद भूषवून मंडळाला हातभार लावला . नवख्या समाधानने ही कोणतीही तक्रार करता त्याचा पहिला किल्ला सर केला. सार्वजनिक वाहतुकीची त्याने धास्ती घेतली नाही तर तो या पुढे हि ट्रेक ला येईल असे नक्की वाटते.असा अनुभव आहे कि परतीचा प्रवास हा पण खूप मनोरंजक ठरतो . काही नियोजन नसताना आणि कोणतीही आगाऊ तिकीट नसताना आम्हाला पुन्हा कल्याण गाठायचे होते .चावंडवाडी वरून आम्हाला जुन्नर ला जाण्यास एसटी मिळाली परंतु जुन्नर ते कल्याण प्रवासासाठी साठी सुखकारक  वाहन मिळाले नाही . जुन्नरला जेवण करून आम्ही एसटी साठी प्रयन्त केले पण यश मिळाले नाही. शेवटी आम्ही ओतूर गाठले आणि तिथे आमचा परतीचा प्रवास संध्याकाळी .३० ला सुरु झाला . वाटेमध्ये खुबी फाट्या जवळ काही शिवभक्तांनी शिवजयंती निमित्त गोड जिलेबी दिल्या. मस्त पेट पूजा करून आम्ही कल्याण गाठलं आणि एक चांगला अनुभव घेऊन ट्रेकची सांगता झाली.

चामुंडा देवीचे मंदिर

पाऊल संघ : सोनल , राहुल, अनिकेत , समाधान , नरेंद्र

  किल्ल्या विषयी इतिहासः

ह्या किल्ल्याचे अनेक चांगले संदर्भ इतिहासात सापडतात. येथील पाण्याच्या टाक्यांचे काम सातवाहन काली झाले आहे . निजामशाहीचा संस्थापक " मलिक अहमद " ला हा किल्ला मिळाला असा उल्लेख आहे(१४८५). या नंतर निजामाचा संदर्भ मिळतो तो १५९४ मध्ये ! सातवा निजाम दुसरा बुर्हाण निजामशाह. याचा नातु बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता. त्यांनतर शहाजी राजे ह्यांनी निरीजामशाहीला वाचण्या साठी चावंड हा किल्ला मोगलांना १६३६ मध्ये दिला . १६७२ चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले. महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले. असे अनेक संदर्भ आपणास मिळतात.


किल्ल्या विषयी इतिहास




किल्ल्याचे प्रवेशद्वार 

मुख्य प्रवेशद्वाराजवळून जाणाऱ्या पायऱ्या 

उखळ सदृश दगडी भांडे आणि जुन्या काळातील टॉयलेट 



सप्तमातृका कुंडाच्या दरवाज्यावरील सुंदर गणेश मूर्ती 

गडावर जाण्या वाटेवर असलेली छोटी तोफ -  जंबुरका 

गडाच्या पायथ्यापासूनच पायऱ्या सुरु होतात  

गडाच्या पायथ्यापासूनच पायऱ्या सुरु होता : पाऊल टीम 



गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या 

गडमाथ्यावर जाण्यासाठी सुरक्षिततेसाठी लावलेल्या पायऱ्या 

भक्कम बुरुज 

गडमाथ्यावर जाणाऱ्या  पायऱ्या 


ह्या पायऱ्या उंचीने मोठ्या आहेत . ह्या पार केल्यावर मुख्य प्रवेशद्वार येते 


मुख्य प्रवेशद्वाराजवळ 


मुख्य प्रवेशद्वार (फोटो आतील बाजूने काढला  आहे) 
मुख्य प्रवेशद्वार (फोटो बुरुजासमोरील तटबंदीवरुन काढला  आहे ) 


चामुंडा देवी मंदिराजवळ पडलेले अवशेष 

चामुंडा देवी 


सप्तमातृका -पाण्याच्या ७ टाक्या 





किल्ल्यावरुन माणिकडोह व कुकडी जलाशयाचे मनोहरी दृष्य 


भग्न शिवमंदिर 

महादेव मंदिर- याची पूर्णतः पडझड झाली असली तरी पडलेल्या दगडांच्या आकारावरून त्यावरचे सुरेख कोरीवकाम लक्षात येते

 ७५० च्या आसपास शिलाहारांनी वंशाच्या राजांनी हे मंदिर बांधले असावे

हरिश्चंद्र किल्ल्यावरील मंदिरासमोरील तलाव आणी ह्या महादेव मंदिरासमोरील तलाव जवळपास सारखेच आहेत

सोनल मंदिरातील भग्न अवशेष पाहताना 

महादेव मंदिरावरील शिल्पे

महादेव मंदिरासमोरील देवळ्या

धान्याची कोठारे


धान्य कोठारे / गुहा 

धान्य कोठारे / गुहा 



गडावरील पाण्याच्या टाक्या 


गडावरील पाण्याच्या टाक्या 

गडावरील पाण्याच्या टाक्या 

गडावरील पाण्याच्या टाक्या 

अनिकेत 

समाधान

राहुल 

सोनल 

नरेंद्र 


नरेंद्र-सोनल-समाधान-राहुल 



बुलबुल 







मुख्य प्रवेशद्वाराजवळ  


धान्यकोठाराजवळ 

बद्रीनाथाचे दर्शन ! १७.०६. २०२४

 बद्रीनाथाचे दर्शन !   केदारनाथ धाम , तुंगनाथ महादेवमंदिर आणि  चंद्रशिला शिखर असा प्रवास करत आम्ही  उत्तराखंड राज्याच्या दोन धाम यात्रेच्या ...