अलंग - मदन - कुलंग (AMK - ALANG MADAN KULANG FORTS)
८ ते १० मार्च
 |
आंबेवाडी गावातून दिसणारे अलंग - मदन - कुलंग दुर्ग त्रिकुट |
अलंग - मदन - कुलंग
AMK म्हणजे अलंगगड -मदनगड आणि कुलंगगड ! हे दुर्ग त्रिकुट ट्रेकिंग वर्तुळात अतिशय प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कळसुबाई डोंगररांगेमध्ये हे किल्ले समुद्रसपाटी पासून ४८०० फूट उंचीवर आहेत . आपल्या सह्याद्रीने इतिहास पाहिला आणि जतन केला आहे. कधीकाळी वैभवसंपन्न अश्या राजवटीचे साक्षीदार अलंग मदन आणि कुलंग किल्ले आहेत. आज मात्र हे किल्ले सर करणे अतिशय कठीण आहेत . किल्ल्यावर जाणाऱ्या सोप्या वाटा आणि पायऱ्या ब्रिटिश सत्तेने सुरुंग लावून नष्ट केल्या आहेत. मराठी सत्तेच्या ह्या बलस्थानांना कमकुवत आणि पुन्हा जिंकण्यास कठीण करण्यासाठी हे उद्योग ब्रिटिश सत्तेने केले होते. हरलेले किल्ले मराठी साम्राज पुन्हा मिळवते हे ब्रिटिशांना माहिती होते . त्यामुळे गडावर जाणाऱ्या वाटा बिकट करणे , गडावरील पाण्याच्या टाक्यामधील झरे विझवणे असे प्रकार ब्रिटिश सत्तेने केले. १८१८ साली मराठे शाहीचा अंत करताना ब्रिटिशांनी अनेक किल्ल्यांची अशीच दुरावस्था करून ठेवली. अश्या कठीण आणि बिकट वाट असलेल्या किल्ल्यांमध्ये अलंग - मदन-कुलंग प्रसिद्ध असण्याचे कारण की पर्वतारोहण करताना तुम्हाला मूलभूत रॉक क्लाइंबिंगची साधने सुरक्षेची खात्री करण्यासाठी वापरावी लागतात. अलंगवर २५ आणि ५० फुटाचा रॉक पॅच आहे तर मदन वर ४० फुटांचा रॉक पॅच आहे . या सोबत गर्द आणि वाट चुकवणारे रस्ते ही येथे आहेत. गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या कमी जास्त प्रमाणात धोकादायक आहेत. अश्या सर्व कारणाने हा ट्रेक कठीण प्रकारात मोडतो. शिस्तीने , धीराने आणि आवडीने हा ट्रेक केला तर तुमच्या गाठीला अविस्मरणीय अनुभव बांधला जाईल ह्यात शंका नाही.
 |
कुलंग गडावरून दिसणारे अलंगगड आणि मदनगड |
ट्रेकिंगची सुरुवात :
हौशी मित्रांचा ग्रुप दरवर्षी गोव्याला जाण्याची योजना बनवतात. गोव्यालाजाणारी योजना जशी बनते तशी हळू हळू अनंतात विलीन होते. त्याचप्रमाणे दर हिवाळ्यात " AMK ला ह्या वर्षी जाऊच " , " ह्या वर्षी AMK करूच " असे आम्ही बोलत असायचो पण आमच्या योजना ह्या गोव्याच्या प्लॅन प्रमाणे अनंतात विलीन व्हायचा 😅 . २०१२ पासून ट्रेकिंगला सुरुवात केल्यानंतर मला हळू हळू कळू लागले की इतिहासाच्या पुस्तकात दिलेल्या किल्ल्यांपलीकडेही अनेक अद्भुत किल्ले सह्याद्रीच्या कुशीत आहेत. AMK संच हा असाच अद्भुत आणि लयभारी प्रकारात मोडणारा ट्रेक आहे . " माझा AMK झाला आहे " ह्या वाक्यात थोडा गर्व असेलही पण त्यामागचा आनंद खूप असतो ह्याची कल्पना प्रत्येक हाडाच्या ट्रेकरला असते. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या भटक्यालोकांसाठी अलंग - मदन - कुलंग सर करणे ही एकप्रकारची स्वप्नपूर्ती असते. गेल्याच वर्षी आमच्या मित्रांनी AMK ट्रेक केला तेव्हा त्यांचे अनुभव ऐकून आपणही गेले पाहिजे होते असे वाटले. पण योग जुळून आला ते २०१९ मध्ये. अभिनव २६ जानेवारीला AMK ला जाऊन आला . २ दिवसात AMK पूर्ण करतानाचे त्याचे अनुभव ऐकून आम्ही हा ट्रेक ३ दिवसात करण्याचे ठरवले. अभिनवही आमच्या सोबत येणार होताच. सर्व ट्रेकचे नियोजन अभिनवने केले. दिवस ठरले. ८ ते १० मार्च ! अभिनव , वैशाली , राजू , विग्नेशा , महेश , मी आणि शेवटच्या क्षणी धवल AMK ट्रेकला येण्यास तयार झाला . एक जबरदस्त ट्रेक धवल शिवाय होऊच शकत नाही . तो सोबत येणार असल्याने सर्वांना हुरूप आला आणि सर्व जण सज्ज झाले ते एक अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी !
 |
मदनगड येण्यापूर्वी दिसणारे शिल्प |
 |
मदनगडाच्या सुरुवातीच्या कातळकोरीव पायऱ्या |
ड्रीम ट्रेक आणि मनातील धकधक :
ट्रेकची कठीणता जास्त असल्याने मी काही ब्लॉग वाचले आणि कोणत्या वळणावर आपणास जपून जायला हवे हे समजून घेतले . सचिनला फोन करून काय काळजी घ्यावी लागते ते विचारून घेतले ! सचिन आश्वासकपणे म्हणाला की , " नरु आरामात जा ,मदन जरा जपून करा पण बाकी तुम्ही धमाल कराल " . बस्स ह्या वाक्याने मी निश्चिन्त झालो . कमीत कमी वजन बॅग मध्ये घेण्याचे ठरवले होते पण पाणी , कॅमेरा आणि स्लीपिंग बॅगमुळे सॅकचे वजन जास्त झाले होते. आईच्या भाषेत सांगायचे म्हणजे अंगापेक्षा बोन्गा मोठा झाला होता. त्यात माझी सॅक एकदा शिवून घेतली होती त्यामुळे मोक्याच्या क्षणी तिचे बंध तुटू नये हीच प्रार्थना करत होतो . शेवटी सामोरे येईल ते अनुभवायचे असे ठरवले आणि राजू सोबत कसारा गाठले. सर्वजण एकत्र जमलो . कसारा वरून ठरलेली महिंद्रा मॅक्स पकडून आम्ही आंबेवाडीस पोहोचलो . विठ्ठल दादाच्या घरी आम्ही उतरलो आणि सकाळी लवकर ऊठून ट्रेक सुरु करायचे ठरवले. सकाळीच मस्त चहा आणि पोह्याचा नाश्ता करून आम्ही ट्रेक ला सुरुवात केली . ट्रेकसाठी लागणारे सुरक्षेचे सामान आणि आम्हाला मदत करण्यासाठी खुद्द विठ्ठल दादा सोबत होता. भल्या पहाटेच आम्ही आमच्या ड्रीम ट्रेक साठी निघलो . समोर अलंग - मदन - कुलंग दिसत होते . सरळ जाणारी वाट आता एका शेतात शिरली आणि ट्रेक ला सुरुवात झाली .
 |
एक अवघड वळण जेथे आपणस काळजी घ्यावी लागते - मदनगड |
 |
मदनगडाकडे जाताना |
 |
जातोय बारा का ? ! फोटो काढा 😜 |
आंबेवाडी ते मदन : (दिवस पहिला ,सकाळ )
सर्वप्रथम मदन किल्ला करून वस्ती साठी अलंगवर जायचे असे ठरले. वाट जंगलात सुरु झाली तेव्हा आमच्या डाव्या बाजूस कळसुबाई होतीं . मधील चढणीस अभिनवला थोडा थकवा जाणवला . त्याला थोडा विश्रांती करण्यास सांगून आम्ही अंतर कापायचे ठरवले. पण पुढे जाऊन आम्ही मागे राहिलेल्यांची वाट पाहू लागलो . वाट पाहताना आम्हालाही थोडा आराम मिळाला. सर्व एकत्र जायचे हा नियम म्हणून सर्व एकत्र आल्यावरच आम्ही पुढे निघालो. आता मात्र लवकर अलंग आणि मदन च्या घळीत पोहोचायचे होते . वाटेत एका शिळेवर एक शिल्प कोरले आहे आणि तीन त्रिशुळाच्या टोकाप्रमाणे आकृती आहे . विठ्ठल दादाच्या सांगण्यानुसार ते एक ग्राम दैवत आहे पण अधिक माहिती त्या मागे असावी असे वाटते . पुढे जंगलातून वाट काढत आणि रानटी कडिपत्त्याचा सुगंध घेत आम्ही कातळ कोरीव पायऱ्यांवर पोहोचलो . त्या पटापट पार करत आम्ही अशा ठिकाणी पोहचलो जिथे एक गुहा होती . ती गुहा अलंग किल्ल्याचा एक भाग आहे. गुहेच्या दिशेने तोंड केले तर डावीकडे अलंग आणि उजवीकडे मदनगडास जाणारी वाट आहे. गुहेत माकडांचा त्रास ! त्यामुळे गुहेच्या खाली एका कपारी मध्ये आम्ही सॅक टाकल्या आणि पाणी कॅमेरे घेऊन मदनगडाकडे निघालो.
 |
मदनगडावरील पायऱ्या |
 |
हे बऱ्यापैकी सोपे आहे ! 😵 |
 |
मदनगड - ४० ते ५० फुटांचा रॉक पॅच |
 |
मदनगड |
 |
मदनगडावरील तटबंदी |
मदनगडचा थरार आणि क्लाइंबिंग : (दिवस पहिला,दुपार )
अलंग ते मदन प्रवास हा काहीसा झाडीझुडुपातुन जाणारा आहे . दरीच्या कडे कडेने जाणारा हा रास्ता चालण्यास सुरक्षित आहे. आडवा रस्ता पार केला की कातळकोरीव सुंदर पायऱ्या दिसतात . इतक्या कठीण जागी ह्या पायऱ्या कश्या बांधल्या गेल्या असतील ह्याची कल्पना केली तर त्याचे मोल आणि महत्व आपणास नक्की समजेल . अवघड वाट सुकर करण्याचे काम पूर्वजांनी कोणतीही अद्यावत सुविधा नसताना केले हे विशेष ! थोड्याश्या आखुड अश्या ह्या पायऱ्या जपून चढाव्या लागतात कारण एकाबाजूला दरी आहे . पुढे असा एक मार्ग येतो तिथे आपल्याला लाईफ लाईन (सुरक्षा दोरी ) लावावी लागते आणि तिला नीट पकडूनच आपल्याला तो मार्ग पार करावा लागतो. खरे सांगायचे तर खाली सरळ खोल खोरे आहे. त्यामुळे मला माझ्या प्रोजेक्ट वरील एका कोरियन अधिकाऱ्याचे शब्द आठवले " Safety First " म्हणजेच " सुरक्षा सर्वप्रथम ". आपण कितीही निडर असो , आपल्याला निसर्गाचा मान राखायचा आहे आणि तो राखतंच ट्रेक करायचे आहे हे मला नव्याने उमगले . पुढे पायऱ्या चढताना कड्यास अनेक ठिकाणी बोल्ट आणि हुक दिसतात . मानसिक आधार म्हणून ह्या हुकांमध्ये एक बोट जरी अडकवले तरी खूप मोठी सेफ्टी आपल्याकडे आहे असा खुळा पण आश्वस्त अनुभव येतो . मध्यावर कुलंगपेक्षा कमी कठीण असा सरळ कातळकडा आहे . पूर्वी तिथे ही पायऱ्या असाव्यात पण ब्रिटिशांनी सुरंग लावून त्या उडवल्या आणि सोपा मार्ग पुरता कठीण केला. विठ्ठल दादा त्या ४० ते ५० फुटी कातळकड्यावर विलक्षण चपळाईने फ्री क्लाइंब करून चढला. त्याने सर्व सुरक्षेचे दोर सोडले आणि अभिनव आणि विठ्ठल दादाने आम्हा सर्वाना लीलया तो कातळकडा पार करून दिला. इथे मनात भीती नव्हती . राजू आणि धवलने सीट हार्नेस न लावता फक्त योग्य पद्धतीने दोरीचा फास लावून कातळकडा पार केला . विग्नेशा आणि वैशूने पण सहज आणि न डगमगता कडा पार केला . महेशची पहिली वेळ पण त्याला ही काही त्रास झाला नाही. सर्व आनंदित. पुढे पायवाटेने जात आम्ही गडमाथ्यावर आलो .
 |
मदनगडावरील पाण्याच्या टाक्यातील मासे |
 |
किरडा आणि कळसुबाई शिखराचे दर्शन - मदनगडावरून |
 |
कळसुबाई शिखर आणि त्यावरील छोटेसे देवीचे मंदिर - मदनगडावरून |
मदनगड : (दिवस पहिला , दुपार )
मदनगडाच्या माथ्यावर आल्यावर समजते की गडाचा पसारा फार मोठा नाही . गडावर पाण्याची टाकी आहेत आणि २० ते २५ माणसे राहतील अशी गुहा आहे . टाक्यातील पाणी पिण्यालायक असून पाण्यात आम्हाला छान रंगेबीरंगी मासे ही दिसले. उन्हाळा सुरु होत असताना ४५०० फूट उंचीवरील टाक्यांमध्ये सुंदर मासे पाहून आश्चर्य वाटले . इथून अलंग - कुलंग आणि कळसुबाई चे छान दर्शन होते . गडाच्या उंचावरील जागेत सोसाट्याच्या वाऱ्याने भगवा फडकत होता . कोणत्याही प्रकारची घाई नसल्याने तिथे आम्ही मस्त फोटो काढले आणि गप्पा मारल्या . ह्या गडावर एक नेढे आहे ते आपणास कुलंग उतरताना दिसते. ह्या गडावरून भंडारदराचे पाणी आणि त्या सभोवतालचे सुंदर गाव दिसते आणि त्या मागेच आजोबा , रतनगड आणि हरिशचंद्रगड दिसतात . असा नजारा पहिला की रखरखत्या उन्हात इतके धाडसकरून आल्याचे सार्थक वाटते. शहर सोडून भंडारदऱ्याच्या शेजारी रहायला यावे असे नक्की वाटते . मस्त वेळ जात होता आणि तेवढ्यात आम्ही कुठे भटकलो नाही ना ह्या काळजी पोटी विठ्ठल दादा गडमाथ्यावर आला आणि त्याने आम्हाला आवाज दिला . अलंगकडे निघायचे होते . आम्ही सर्व मदनगड उतरू लागलो. येथे अलंग गडाकडे उभे राहून ओरडल्यास आपणस इको हि ऐकू येतो . उतरताना निसर्गाचा हा पण चमत्कार अनुभवाला ! उतरताना जरा धीराने उतरलो . काही ठिकाणी माती आणि छोटे खडक आहेत त्यामुळे सयंम ठेवून उतरावे लागले . जसे आम्ही नीट क्लाइंब केले तसेच नीट रॅपलिंग करून सुखरूप अलंगच्या गुहेजवळ पोहोचलो . पुढे वाट पाहत होता तो २५ आणि ६० फुटी कातळकडा आणि काही कापरे भरवणारे क्षण !
 |
भंडारदरा - रतनगड - आजोबागड : मदनगडावरून |
 |
मदनगडावरील गुहा - २० ते २५ जण येथे राहू शकतात |
 |
घोड्याच्या नळीप्रमाणे दिसणारा अलंगगड (मदनगडावरून) |
 |
मदनगडावरील पाण्याच्या टाक्या |
महिला दिन आणि अलंगचा कडा : (दिवस पहिला ,दुपार )
आता थोडा आत्मविश्वास आला होता . आम्ही आता मोठ्या आव्हाहनासाठी सज्ज झालो होतो. भीती दूर उडून गेली होती . आता फक्त अनुभवायचा होता तो अलंगचा किल्ला ! पहिला २५ फुटांचा कांदा आम्ही निवांत सर केला .पुढे ६० फुटांचा कडा होता . अगदी सरळ आणि खाली खोल दरी असे स्वरूप ! हा भाग ही सुरुंग लावून फोडला गेला होता. त्याचे निशाण तिथे दिसत होते. ब्रिटिशांनी अगदी पद्धतशीरपणे आणि मोक्याच्या ठिकाणी आगाऊपणा केला आहे. विठ्ठलदादाने पुन्हा एकदा फ्री क्लाइंब करून दोर टाकले. ह्यावेळी मात्र विठ्ठलदादाने जपून चढाई केली. त्याच्या मनगटातील ताकदीला आणि कौशल्याला आम्ही सर्वांनी सलाम केला . आम्ही सर्व सीट हार्नेस घालून रेडी होतो . आधी राजू ने कडा पार केला. त्याने इतका भर भर पार केला की आम्हाला वाटले की " सोपाय हे ! " आणि इथेच आम्ही फसलो. आमची पाळी आली तेव्हा समजले की अंगातील रग निघते आणि खूप संयमाने चढाई करावी लागते. कातळावर पाय नीट रोवून आणि त्यावरील खाचा खळग्यांचा आधार घेत वर जावे लागले . आम्हाला चांगले तांत्रिक मार्गदर्शन असल्याने कोणताही धोका नव्हता . महेश मी आणि धवल ने फार कुठेही न वेळ काढता कडा पार केला . विशेष होते ते आमच्या ग्रुप मधील मुलींचे ! वैशू आणि विग्नेशा ह्या पण आमच्या पेक्षा कमी नाही . महिला दिनी त्यांनीही आम्हाला तोडीसतोड दमखम दाखवून सांगितले दिले की त्या पण काही कमी नाहीत. आम्हाला तर त्यांचा अभिमान आहे . पूर्ण ट्रेक मध्ये त्यांनी जे धैर्य आणि जिद्द दाखवली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. विग्नेशा आणि वैशू आता अनुभवी आणि मुरलेल्या ट्रेकर्स झाल्या आहेत. विग्नेशा आणि वैशू सोबत ट्रेक करणे हि माझ्या साठी भाग्याची गोष्ट आहे. विग्नेशाला थोडा पायाच्या वेदनेचा त्रास होतो पण त्यावर मात करून तिने अनेक किल्ले सर केले आहेत. तिने लवकरच किल्ल्यांची १००री गाठावी असे मला वाटते. अभिनवने वैशूचा क्लायंबिंगचा व्हिडीओ फेसबुक वर लाईव्ह टाकून खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचे रूप जगाला दाखवले आणि खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केला. कारण मुलगी घर सांभाळू शकते , नोकरी करू शकते आणि धाडसी छंदही जोपासूशकते हे विग्नेशा आणि वैशूने दाखवून दिले. पुढे कातळकडा पार करून आम्ही गुहेमध्ये सर्वानी काही मिनिटे आराम केला. मग परत बॅग्स अंगावर चढवून गडमाथ्यवर जाण्यास निघालो. आता ज्या पायऱ्या होत्या त्या थोड्या कठीण आहेत कारण येथे ही खाली दरी आहे आणि पायऱ्या खूप छोट्या आहेत. इथे ही विठ्ठलदादाने सुरक्षेसाठी दोरी बांधलेली होती. त्या दोरीला पकडून आम्ही निवांत गडमाथवर आलो. वर आल्यावर खूपच आनंद झाला . एका बाजूला गुहा आणि दुसऱ्या बाजूला मदन आणि कुलंग असे ते विस्तर्ण रूप पाहून मी भारावून गेलो होतो .
 |
अलंगगडावर जाण्यासाठी लागणार पहिला २५ फुटी रॉक पॅच |
 |
कोरीव शिल्प |
 |
मदनगडावर जाताना लागणार ६० फुटी सरळ कातळकडा |
अलंगगड : (दिवस पहिला , दुपार ते सायंकाळ )
गुहेच्या दिशेकडे जाताना एक शिवाची पिंड आहे . ती शिव पिंड पडीक भिंतींच्या मध्ये आहे. त्या पुढेच पाण्याची टाकी आहेत. पाण्याच्या टाक्यापार केल्या की गुहांचा संच आहे . ह्याच गुहा आमच्या आजच्या आसऱ्याचे ठिकाण होते . गुहांच्या शेजारी पाण्याच्या टाक्या आहेत पण आम्हाला त्यातील पाणी पिण्या योग्य वाटले नाही . गुहाही स्वच्छ नव्हती . सर्वत्र धुळीचे साम्राज्य . गुहेत ४० ते ५० माणसे आरामात राहू शकतात. आम्ही सर्वप्रथम बॅग्स ठेवल्या आणि थोडी साफ सफाई करून जेवणाचे डब्बे बाहेर काढले. खूप भूक लागली होती. महेशचा नेहमीचा ठेचा आणि भाकरी तसेच विठ्ठलदादाची घराच्या भाकरी आणि भाजीची चव एकदम झक्कास होती. जेवणांनंतर आम्ही बाहेर पडलो ते गड फिरण्यास . अलंगगड हा मोठ्या भावासारखाच आहे . उंचीनेही मोठा आणि विस्तारानेही मोठा आहे . गुहेच्या वर चालत गेल्यास आपणास अनेक भग्न अवशेष दिसतात . अनेक घरांचे किंवा वाड्यांचे जोथे तिथे असावेत . पुढे गेलो की आपल्याला ११ टाक्यांचा संच दिसतो . खूप सुंदर आणि विशिष्ट पद्धतीने बांधलेल्या ह्या टाक्यांना एक बांधही आहे . एक टाके भरले कि दुसऱ्या टाक्यात पाणी साचेल अशी बांधणी आहे आणि सर्व टाकी भरली की त्याचे पाणी अडवण्यास धरणासारखा बांधही आहे. भर उन्हातही ह्या टाक्यातील पाणी आटत नाही . असे तंत्रज्ञान त्याकाळी ४५०० फूट उंचीवर राबवले गेले हे विशेष नाही का ? पुढे गेल्यावर पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. वाड्याच्या भीती अगदी काटकोनात आहेत . पुढे काही पाण्याची टाकी आहेत. कळसुबाई च्या दिशेने आपण चालत राहिलो की आपणास उतारावर एक पडके मंदिर लागते आणि तिथे एक शिलालेख आहे. काहीही करून सूर्यास्ता आधी हा शिलालेख पाहायचा असे आमचे ठरले होते आणि तसेच झाले त्यामुळे आता आम्ही निवांत होतो. किल्ल्याच्या टोकावरही पाझर टाक्या आहेत . पाण्याची चांगली सोय ह्या अजस्त्र गडावर आहे . आता हळूहळू सूर्यास्त होत होता क्षितिजाकडे तोंड करून आम्ही सूर्यास्ताची वाट पाहत होतो . प्रत्येक गडावरील सूर्यास्त आणि सूर्योदय हे विलोभनीय असतात . समोर मदन आणि कुलंग दिसत होते . गडावर खूप फेरफटका मारला पण आता आम्ही अस्ताला जाणारा सूर्य पाहत शांत बसलो होतो . मंद ,शांत आणि मनाला भुरळ घालणारा सह्याद्रीच हे रूप खूप छान दिसत होते.
 |
अलंगगडावर पोहोचल्यावर दिसणारे पहिले दृश्य - गुहा आणि वाडा |
 |
अलंगगड : शिवपिंड आणि नंदी |
 |
अलंगगड : गुहा - ह्यात ४० ते ५० माणसे राहू शकतात |
 |
अलंगगड : गुहा |
अलंगगडावरील रात्र : (दिवस पहिला , रात्र )
विठ्ठलदादाने आमच्यासाठी खास जेवण बनवलले होते . गड फिरल्यानांतर आम्ही निवांत गुहे मध्ये सामानाची आवारावर करून गुहेच्या तोंडावर येऊन बसलो . काळोख वाढत होता आणि चांदण्याचा प्रकाश लख्ख होत होता . शांत आणि मंद वारा मनाचा थकवा दूर करत होता . क्षितिजावर रंग बदलत जात होते . काळोख वाढला आणि आकाशात तारकासमूह धुंडाळत आम्ही गप्पा मारत होतो. आजचा दिवस खासच होता . आंबेवाडी ते मदन आणि आता प्रत्यक्ष अलंग असताना जे अनुभव आले ते सर्व एकमेकांना सांगत होतो . शेवटी आपण येथे आलोच. सगळा जीवाचा आटापिटा सार्थकी लागला असेच वाटत होते . दिवसभराचा थकवा कुठच्याकुठे पळून गेला होता . दुसऱ्या दिवशी गड उतार करताना पुन्हा रॅपलिंग करायचे होते. आम्ही सर्व उत्सुक होतो . उद्या भल्या पहाटे सर्व आवरून कुलंग कडे निघायचे म्हणून आम्ही झोपी गेलो. शांत वातावरण , पोट आणि मन भरेल असे मस्त जेवण , गुहेतील गारवा , गडावरील सुंदर वास्तू , चांदण्याचा सडा पडलेलं आकाश आणि जिवाभावाचे मित्र अश्या सुखदायक आठवणींत झोप कधी लागली समजली नाही .
 |
अलंगगड : अप्रतिम ११ टाक्यांचा संच |
 |
अलंगगड : पडीक अवशेष |
 |
अलंगगड : ११ टाक्या आणि त्याला बांधलेला बांध |
 |
अलंगगड : वाडा |
 |
अलंगगड : वाडयापुढील पाण्याचे टाके |
 |
अलंगगड : शिलालेख |
 |
अलंगगड : भग्न मंदिर जेथे शिलालेख आढळतो |
 |
अलंगगड : पाऊल ट्रेकर्स |
 |
अलंगगड : छोट्या कुलंगच्या क्षितिजावर दिसणारा सूर्यास्त |
 |
अलंगगड : समोरील कुलंगगड |
 |
अलंगगड : रात्री जेवण बनवण्यास पेटवलेली चूल |
 |
अलंगगड : उभा ६० फुटी कातळकडा , ब्रिटिशांनी काढायला लावलेले सुरुंगाचे निशाण अजूनही दिसतात |
 |
अलंगगड : महेश रॅपलिंग करताना |
कमांडो राजू : (दिवस दुसरा , सकाळ )
सकाळी भल्यापहाटे अलार्म वाजला . नकोसाच वाटत होता . पण उठणे गरजेचे होते. काही जणांनी गुहा साफ केली आणि आम्ही ११ टाक्यांवर सर्व पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. सकाळी चहा सोबत मस्त तळलेला फोडणीचा भात नाश्त्याला होता. सर्व पटापट फस्त करून आम्ही बॅग्स अंगावर घेतल्या आणि गड उतरणीला सुरुवात केली . जाताना गडाला नमस्कार केला . नकळत हात जोडले गेले. विठ्ठल दादाचा राजुवर खूप भरवसा आहे असे दिसले. एका मागून एक आम्ही रॅपलिंग करून उतरलो. मागे फक्त राजू राहिला. त्याला कमांडो रॅपलिंगने खाली उतरवायचे असे विठ्ठलदादा ने ठरवले. राजुही तयार झाला . ढुंगण जमिनीच्या दिशेने आणि आमचे डोके आकाशाच्या दिशेने अश्या अवस्थेत आम्ही सर्वानी रॅपलिंग केली. पण कमांडो रॅपलिंगला मात्र चित्र उलटे होते. डोके जमिनीकडे आणि ढुंगण आकाशाकडे ! कमांडो रॅपलिंग साठी दुप्पट सुरक्षा होती . जमिनीच्या दिशेने तोंड करत राजुने एकदम भारी कमांडो रॅपलिंग केले . एकेकाळी बिसलेरी शिवाय पाणी न पिणारा हा आज टाक्यातील पाणी पिऊ लागला आणि सह्याद्रीला आपले समजू लागला ह्याचे खरे श्रेय आपल्या सह्याद्रीच्या पाण्याचे आणि मातीचे आहे . असे साहस करताना त्याने स्वतःला नव्याने उमगले असेल असे मला नक्की वाटते . अशी अनुभूती मला आणि माझ्या साथीदारांना नेहमीच मिळत असते . सह्याद्रीत स्वतःला नव्याने जाणण्याचा छंद म्हणजे ट्रेकिंग असे मी म्हणेन ! राजुच्या ह्या प्रयत्नाने आम्ही त्याचे नामकरण कमान्डो राजू असे केले आणि कुलंगकडे प्रस्थान केले
लिंक वर क्लिक करा
https://www.youtube.com/watch?v=yluMbJzPAmo
 |
अलंगगड : राजू नांदगावकर |
 |
अलंगगड ते कुलंगगड व्हाया मदनगड - धवल -विग्नेशा - राजू |
अलंग ते कुलंग (दिवस दुसरा, सकाळ)
२५ फुटाचा कातळ कडा उतरणे आता सोपे वाटत होते . उतरताना विग्नेशा आणि धवलला आवाज करत येणारा मधमाशीचा थवा दिसला . आम्हाला वाटले की आपल्याला डंक पडणार. पण ज्या वेगाने तो थवा आला त्याच वेगाने तो दिशा बदलून गेला . सुटकेचा निश्वास टाकून आम्ही कुलंगकडे निघालो. पुन्हा मदनच्या दिशेने वाटचाल केली. कुलंगकडे जाणारी वाट मदनला वळसा मारून जाते . आता फक्त पायपीट होती . दरीच्या किनाऱ्यावरून चालत चालत आम्ही मदन जवळ पोहोचलो . एका झोपडी करून एक वाट खाली जाते . ती पकडून आम्ही न थांबता चालत राहिलो. मध्ये एक घसरता उतार आहे . तिथे दोर लावून सर्वजण उतरलो . मदनगड पार करून एका कपारीत आम्ही विसावलो. उन्ह खूप होते. कपारीत सावली आणि थंड वाऱ्यामुळे आम्ही तिथे थांबलो. समोरचा सर्व परिसर मी न्याहाळत होतो . अजस्त्र पर्वत आणि त्या पर्वतांमध्ये आम्ही भटके असे फिरत होतो की हेच आमचे घर आहे . मदन ते कुलंग अंतर जास्तीत जास्त आडव्या वळणाचे आहे . उन्ह सोडले तर फार त्रास आम्हाला झाला नाही . आम्ही आता दोन ग्रुप मध्ये चालत होतो. एक ग्रुप पुढे जाऊन लाकडे गोळा करणार होता. कुलंग आणि मदनचा मध्ये जी सामायिक जागा आहे इथे आम्ही लाकडे गोळा केली . सर्वानी २ लाकडे हातात धरली आणि कुलंग कडे चालू लागलो .
 |
कुलंगगड : गडावर जाताना लागणारे अवघड वळण |
 |
कुलंगगड : एक जोखमीचे वळण |
 |
कुलंगगड : प्रवेशद्वाराच्या जवळ |
कुलंगची चढाई ( दिवस दुसरा , दुपार ) :
रणरणते उन्ह ! अंगावर बॅग आणि हातात लाकडे अशी आमची अवस्था. कुलंग तसा चढाईसाठी बरा किल्ला आहे . आम्ही पूर्वी येथे आलो असल्याने मार्ग ओळखीचा होता . येथे पर्वतारोहणाच्या साधनांची आवशक्यता नाही . येथील पायऱ्या ही चालण्यास सुरक्षित आहे . फक्त एक वळण सोडले तर सर्व मार्ग सुरक्षित आहे . ह्या वळणावर आपल्याला चांगलाच घाम फुटतो . लाकडांचे अतिरिक्त वजन घेऊन आम्ही चढत होतो. गडमाथ्यावर येण्या अगोदर आपणस काही गुहा दिसतात . विश्रांतीसाठी त्या बऱ्या आहेत. कुलंग गडमाथ्यावर आल्यावर जिंकल्याची भावना होती. दुसऱ्या दिवसाच्या मध्यावरच आम्ही तिसऱ्या किल्ल्यावर होतो. अजून एक दिवस हाती होता त्यामुळे आज गड निवांत फिरायचा असे ठरले. सर्वप्रथम आम्ही घोषणा देऊन जल्लोष केला आणि खालीच असणाऱ्या ९ पाण्याच्या टाक्यांकडे गेलो. ह्या टाक्यातील पाणी तर शहरी पाण्यालाही लाजवेल इतके गोड होते. पाण्यानी मनाची तृप्ती केली आणि आम्ही गुहेकडे वळालो . कुलंगची गुहा ही मोठी आणि ऐसपैस आहे . इथे बॅग्स ठेवून आम्ही आधी गडाचा मदन आणि अलंग बाजूचा भाग फिरण्यास गेलो. उन्हानें अंगाची लाही होत होती. पुढे धरणाजवळील टाक्याच्या बाजूला येता येता अंघोळी करायची असे ठरले. जेवणही आल्यावर करायचे असे ठरवून आम्ही गड फिरण्यास गेलो.
 |
कुलंगगड : गडमाथा आणि तटबंदी |
 |
कुलंगगड : प्रेक्षणीय अश्या ९ टाक्या |
 |
कुलंगगड : हर हर महादेव ! |
 |
कुलंगगड : महेश - नरेंद्र - धवल - विग्नेशा |
 |
कुलंगगड : धरण / बांध |
 |
कुलंगगड : SIGNATURE पोज |
कुलंगची धमाल ( दिवस दुसरा , दुपार ) :
काही मजेदार प्रसंग नेहमी मनात कायम राहतात आणि आपण ते कधीही विसरू शकत नाही. विग्नेशाने AMK अक्षर तयार करुन फोटो काढायचे ठरवले. आम्ही खूप प्रयत्न केले आणि एकदाचे जमवले. K हे अक्षर तयार करताना आमची अशी वाईट आणि केविलवाणी अवस्था झाली की त्या अक्षरातून उत्पन्न झालेले चित्र आम्ही कधी विसरणार नाही. 😁😁😁
खाली फोटो देत आहे परंतु जी तगमग आम्ही चालवली होती ती मात्र शब्दात सांगणे कठीण. नंतर आम्ही धरणाजवळील पाण्याच्या टाक्याच्या बाजूला अंघोळी ही केली. टाक्यांमध्ये उड्या मारून अंघोळी करणे चुकीचे असल्याने आम्ही टाक्यांतील पाणी अशुद्ध होऊ नये याची काळजी घेऊन त्यातील थंडगार पाण्याने थोड्या लांब अंतरावर आंघोळ्या केल्या . खूप ताजेतवाने वाटत होते त्यामुळे दादाने बनवलेले जेवण जेवण्यास आम्ही लागलीच गुहेजवळ गेलो. जेवण खूपच मस्त होते. एवढा प्रवास केल्यावर आणि अंघोळी नंतर ताजेतवाने झाल्यावर जे जेवण समोर आले त्याची गोडी अमृतासमान होती. नंतर चालू होती ती फक्त फोटोग्राफी आणि सर्वांच्या तोंडातून येत होते ते नेहमीचे आपुलकीचे वाक्य , " ए , माझा असा फोटो काढ ना ! "😅😅😅
 |
AMK चा सफल प्रयत्न भाग - १ 😍😜😝 |
 |
AMK चा सफल प्रयत्न भाग - २ 😍😜😝 |
 |
कुलंगगड : भग्न गायमुख |
 |
कुलंगगड : भग्न श्रीगणेश |
 |
कुलंगगड : पाऊल ट्रेकर्स - गुहेजवळ |
कुलंग आणि धवल ( दिवस दुसरा , दुपार ) :
गडावर मुबलक पाणी आहे . अलंग प्रमाणे गडावर पाण्याच्या टाक्या आहेत ज्यात १२ महिने पाणी असते . काही टाक्यातील पाणी नितळ आणि पाणी थंडगार आहे . गडावर प्रवेशद्वारापाशी ढासळलेले बुरुज आहेत. ९ टाक्यांच्या इथे गणपतीची भग्न मूर्ती आपल्याला दिसते. आताच झालेल्या महाशिवरात्री मध्ये एका मंडळाने शिवाची मूर्ती एका टाकीच्या येथे स्थापित केली आहे. अलंग प्रमाणे येथेही धरण आहे ज्याची रचना सारखी आहे . ह्या धरणाचा आकार मोठा असून यथे एक भग्न गोमुखही पाहण्यास मिळते. गडाच्या एका टोकाला मदन आणि अलंगचे दर्शन घडते . ते पाहताना अंगावर नक्कीच शहारे येतात. कालच आपण ह्या गडाच्या माथ्यावर होतो आणि आज आपण कुलंग वरून त्यांना न्याहाळत आहोत ह्या क्षणाचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. मदन - अलंग - किरडा आणि त्यामागे उत्तुंग कळसुबाई पाहिल्यावर मन भारावून जाते. राखट, कणखर आणि दगडांच्या देशा असे महाराष्ट्राला का म्हणतात हे ह्या नजाऱ्यावरून समजते . गडाची पश्चिम बाजूही त्याकाळी वैभवसंपन्न असेल. या भागात ही अनेक पाण्याची टाकी आहेत आणि अनेक वाड्यांचे भग्न अवशेष आहेत. एका वाडयाचा जोथा खूप मोठा आहे. इथून आम्ही सुंदर सूर्यास्त पाहिला आणि गुहेकडे वळलो . गुहेकडे वळताना एका छोट्या सर्प राजाचे दर्शन झाले . असे दर्शन नेहमी लकी असते असे मी मानतो . गड पूर्ण फिरण्यामध्ये आणि त्याला जाणण्यामध्ये आम्हाला सर्वात जास्त धवलची मदत होते . अनेक ट्रेक केल्यामुळे गडाच्या वाटा आणि भूगोल त्याला खूप लवकर समजतो. त्याचे वाटेचे अंदाज कधी चुकलेले मी पहिले नाही . धवल असेल की आपसूकच तो जबाबदारी उचलतो. गडावरील सर्व महत्वाच्या जागा पाहायच्या असा त्याचा हेतू असतो. वेळ - काळ ह्यांचे भान ठेवून तो नियोजन करतो . सोबत असलेल्या ट्रेकर्सच्या मानसिक चढउताराचीही तो नीट काळजी करतो. गड फिरताना काय करावे आणि काय करू नये हे वेळोवेळी तो सांगत असतो. ह्या गडावर धवल सोबत येण्याची माझी दुसरी वेळ ! पण त्याची गड पाहण्याची भूक किंचितही कमी झालेली दिसली नाही. त्यामध्ये तोच उत्साह मला नेहमी दिसतो. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत गड फिरायचे आणि त्याचा इतिहास जाणून घेऊनच त्याला अनुभवाचे हे धवल कडून शिकण्यासारखे आहे. तो खऱ्या अर्थाने " सर " आहे .
 |
कुलंगगड : धवल |
 |
विठ्ठलदादाच्या घराची मेजवानी |
 |
विठ्ठलदादा सोबत |
सवंगडी : धवल , अभिनव , विग्नेशा , वैशाली , महेश , राजू , नरेंद्र
 |
वैशाली |
 |
विग्नेशा - वैशाली |
 |
नरेंद्र - राजू - धवल |
 |
वैशाली आणि अभिनव |
 |
नरेंद्र |
 |
राजू |
 |
महेश |
 |
पाऊल ट्रेकर्स |
इतिहासा बद्दल थोडेसे : (इंटरनेट वरून साभार ) :
प्राचीन काळात घाटरस्त्यांनी होणारे दळणवळण कोकणातील बंदरांमधून घाटावर होत असे. असेच खूप जुनेघाट सह्याद्रिरांगां मध्ये होते आणी अजूनही आहेत. महत्वाचे व्यापारी केंद्र हे जुन्नर, पैठण आणी नाशिक होते. प्राचीन काळापासून या प्रदेशात होणारे व्यापारी दळणवळण पैठण-जुन्नर, पैठण-नाशिक, नाशिक-नगर, नाशिक-पुणे-मुंबई, मुंबई-नगर हे गोदावरी आणी प्रवरेच्या सुपीक प्रदेशातच उदयाला आले आणी त्या साठी व्यापारीमार्गही तयार झाले. पारनेर, भंडारदरा, इगतपुरी कल्याण हा राजमार्ग होता. येथून कलकत्यापर्यंत माल जात असे. नेवासे ते रतनगड हा महामार्ग त्याकाळात महत्वाचा होता, अकोले, संगमनेर आणी सिन्नर ह्या मार्गावरचे महत्वाचे थांबे होते. याच मार्गावर भव्य शिवमंदिरे आणी बाजारपेठा याची पाऊलखुणा देतात.
सातवाहन काळापासूनच हे राजमार्ग प्रचलित होते. यादवांच्या काळातमात्र या परीसारला पुन्हाएकदा चांगले दिवस आले. रतनगड, अलंग, मदन आणी कुलंग गड यादवांच्या काळातच निर्माण झाले. यादवांच्या साम्राज्यात संपत्तीची मोठ्या प्रमाणावर वाढ असल्याने संरक्षणाची गरज निर्माण झाली आणी त्यासाठी व्यापारीमार्गांचे संरक्षण हया दुर्ग आणी गडांवरून होत असे.
 |
पॅनोरमा - AMK |
 |
अलंगगड - अवशेष |
 |
अलंगगड - मंदिराचे अवशेष |
 |
अलंगगड - अवशेष |
 |
अलंगगड - अवशेष |
 |
अलंगगड - पाण्याचे टाके |
 |
अलंगगड - किरिडाच्या दिशेचे पाण्याचे टाके |
 |
कुलंगगडावरील गुहा आणि आमच्या स्लीपिंग बॅग्स |
 |
कुलंगगडावरील कोरलेले मारुतीचे शिल्प |
 |
एक मावशी आणि २ गवळणी 😆😆😆😆 |
