Saturday, December 2, 2017

रावेरखेडी : थोरले बाजीराव पेशवे यांचे समाधीस्थळ , मध्यप्रदेश ( Shrimant Bajirao Peshwa Samadhi Raverkhedi)

थोरले बाजीराव पेशवे समाधीस्थळ

हा काळ होता " बाजीराव मस्तानी " चित्रपट प्रदर्शन होण्यापूर्वीचा !  छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सर्वात कर्तबगार आणि यशस्वी सेनापती म्हणून थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव घेतले जाते.  फेब्रुवारी २०१६ मध्ये आम्ही ठरवले की आपण थोरले बाजीराव पेशवा ह्यांची मध्यप्रदेशातील रावेरखेडी येथील समाधीस्थळाला भेट द्यायची.  ह्या एका दिवसाच्या भेटी मध्ये  रावेरखेडी सोबत ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग आणि अहिल्याबाई होळकर ह्यांचा प्रसिद्ध "अहिल्या किल्ला आणि महेश्वर महादेवाचे मंदिर  " यांनाही  भेट देण्याचे नियोजन केले . बाजीराव पेशवा सरकार ह्यांची समाधी तशी महाराष्ट्रीयन लोकांसाठी दुर्लक्षित असली तरी मध्येप्रदेश सरकारने समाधी स्थळाची चांगल्या प्रकारे देखभाल केली आहे हे तेथे गेल्यावर जाणवते.  मे  २०१४ साली एक ग्रुप येथे भेट देण्यास गेला होता आणि त्यांचा एक माहिती पूर्ण लेख त्यावेळी फेसबुक वर प्रसिद्ध झाला होता . ह्याच लेखाचा संदर्भ घेऊन आम्ही समाधीस्थळास भेट द्यायचे ठरवले. अनेकांना मस्तानीचा बाजीराव माहिती आहे परंतु उभ्या हयातीत एकूण त्रेचाळीस लढाया लढून सर्व लढाया जिंकल्या असा महापराक्रम थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्या नावावर आहे हे खूप कमी जणांना माहिती आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार संपूर्ण भारतभर पसरवण्यास थोरले बाजीराव पेशवे ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. रावेखेडीला जाण्यापूर्वी मला जे थोडे बहुत वाचनात आले त्याचे संकलन मी येथे करणार आहे .

थोरले बाजीराव पेशवे समाधीस्थळ ( अभिनव - सोनल - नरेंद्र - विग्नेशा - धवल - वैशाली - सचिन ) 

सूचना फलक 

समाधीस्थळाचे मुख्य द्वार 



संक्षिप्त माहिती - थोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८, इ.स. १७०० - एप्रिल २८, इ.स. १७४०) : 
माहिती फलक 

थोरले बाजीराव पेशवे ह्यांना आपण पहिले बाजीराव पेशवे म्हणूनही ओळखतो. १७२० मध्ये त्यानां पेशवेपद  मिळाले. त्यांच्या कारकीर्दी मध्ये त्यांनी अनेक लढाया केल्या व त्या सर्व जिंकल्यासुद्धा ! मराठी साम्राज्याची घोडी नर्मदेपलीकडे घेऊन जाण्याचे श्रेय हे पहिल्या बाजीरावांचे आहे. शिवरायांचे स्वराज्य भारतभर पसरवण्यासाठी त्यांनी असामान्य प्रयत्न केले. माळवा (डिसेंबर,१७२३), धार (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपूर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (१७मे, इ.स. १७३९) या आणि अश्या अनेक मोठ्या लढाया ते जिंकले . भारतात पहिल्या बाजीराव ह्यांच्या प्रराक्रमाला थोडी उपेक्षा मिळाली आहे. बाजीराव म्हंटले की मस्तानी सर्वांना आठवते पण त्यांच्या कर्तृत्वाची भरारी किती उंच होती हा त्यांचा इतिहास जाणल्यावरच आपल्याला समजेल . अकन्साईज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर या युद्धशास्त्रावर आधारीत ग्रंथात ब्रिटिश फिल्ड मार्शल मॉंटगोमरी यांनी जगातील सात लढायांचा उल्लेख केला आहे. त्यात पहिल्या बाजीराव ह्यांनी जिंकलेल्या पालखेड येथील लढाईचा उल्लेख आहे. पालखेडची लढाई युद्ध-लष्करी धोरणांच्या अंमलबजावणीचे एक उत्तम उदाहरण मानले जाते. पहिले बाजीराव कधीही जाती पातीच्या फेऱ्या मध्ये अडकले नाही . त्या काली त्यानां तथाकथित पंडितांकडून खूप विरोध झाला परंतु त्यांनी कुणाला हि भीक घातली नाही. जीवाची बाजी लावणे हा वाक्प्रचार आपल्या कर्तृत्वाने जन्माला घातला. त्यांच्या हयातीत पुण्यात शनिवारवाडा बांधून पुण्याला राजकीय महत्व प्राप्त करून दिले.
बाजीरावास "काशीबाई" ही प्रथम पत्‍नी होती. काशीबाईपासून बाजीरावास रामचंद्र ऊर्फ रघुनाथराव पेशवा, जनार्दन व बाळाजी ऊर्फ नानासाहेब  पेशवा असे ३, तर मस्तानीकडून समशेरबहाद्दर ऊर्फ कृष्णराव असे ४ पुत्र झाले. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला होता.चिमाजी अप्पा हा बाजीरावांचा धाकटा भाऊ. चिमाजी अप्पांनी  देखील कोकण किनार्‍यावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता.
संक्षिप्त जीवनी - पेशवा बाजीराव प्रथम 

" पेशवा सरकार " आणि "रावेरखेडी " 
समाधीस्थळावरील फलक 
२२ फेब्रुवारी २०१६ ला  आम्ही सर्वजण ट्रेनने कल्याणहुन रात्री निघालो . पहाटे ६ वाजता मध्यप्रदेशातील खांडवा स्टेशन वर उतरलो . आम्ही आधीच एक खाजगी गाडी प्रवासासाठी निवडली होती . गाडीच्या ड्राइव्हरसाठी समाधीस्थळ परिचित होते त्यामुळे आम्ही निश्चिन्त होतो. रावेरला जाणारा रस्ता २०१५ साली बांधला होता त्यामुळे आमची कुठेही चुकामुक झाली नाही. मधेच गल्ली बोळातून गाडी रावेर गावी पोहोचली . सकाळी ८ ची वेळ आणि समाधी जवळ फारशी गर्दी नव्हती . सर्वसामान्य गावात अगदी सर्सामान्य अवस्थेत ही  समाधी आहे. मध्यप्रदेश पर्यटन विभागाने येथे सुंदर माहिती फलक येथे लावला आहे आणि समाधीस्थळाची जागा ही मोकळी आणि स्वच्छ आहे . समाधी स्थळाला लागून नर्मदा नदीचा प्रवाह आहे. ग्वाल्हेरच्या शिंदे (सिंधिया) घराण्याने  समाधीस्थळ बांधले आहे असा उल्लेख माहिती फलकावर आहे.  तटबंदीचे मूळ काम अहिल्याबाई होळकर यांनी केलेले होते. दर्शनी भागात एक मोठे पिंपळाचे झाड असून पारावर छोटेसे मारुतीचे देउळ आहे.  प्रवेशद्वाराशी लोखंडी दरवाजा आहे .समाधी स्थळाला चौकोनी आकाराची तटबंदी आहे. ह्या तटबंदीवर जाण्यास पायऱ्या आहेत आणि तटबंदीवर चालण्यास जागा आहे .  समाधी तटबंदीच्या मध्याशी नसून उजव्या बाजूस आहे . समाधीचे बांधकाम दगडी आहे. चौथरा आणि खिडक्यांच्या  जाळ्या नक्षीदार आहे . एका संगम रावरी . दगडावर " This Chatri believed to contain ashes of Peshwa Bajirao who died in 1740 AD " असे लिहले आहे . चौकोनी चौथरा पायऱ्या असलेला आहे व त्यावर अष्टकोनी पाया आहे आणि त्यावर षट्कोनी समाधीस्थळ (छत्री) आहे. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून सनावदजवळ नर्मदा नदीच्या किनारी रावेरखेडी येथे २८ एप्रिल १७४० (वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे आपल्या महापराक्रमी पेशव्याचे निधन झाले.

This Chatri belived to contain ashes of Peshwa Bajirao who died in 1470 AD 

 थोरले बाजीराव पेशवे यांचे समाधीस्थळ 

 थोरले बाजीराव पेशवे यांचे समाधीस्थळ (तटबंदीवरुन घेतलेले छायाचित्र) 

समाधीचे दर्शन केल्यानंतर खूप चांगले वाटले कारण एका मोठ्या योध्याच्या समाधीस्थळाला आपल्याला भेट देता आली. एका अपराजित योध्याच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर अंगात स्फूर्ती येते आणि एक वेगळीच प्रेरणा मिळते . येथील माणसे  " पेशवा सरकार " असा पहिल्या बाजीरावांचा मानाने उल्लेख करतात . त्यांच्या इतिहासाला उजळणी देण्याचा प्रयत्न ही आम्ही एक माहितीपर विडिओ तयार करून केला . खंत ह्या गोष्टीची होती की  मध्यप्रदेशातील धरण  बांधणीच्या प्रकल्पात ही  समाधी भविष्यात पाण्याखाली बुडणार आहे . हे  स्थान प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा होती , ती पूर्ण झाल्याने आम्हा प्रत्येकाच्याच मनात समाधानाची भावना होती . ह्या जागे मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या इतिहासाची शक्ती आहे ज्या मुळे आम्ही भारावून गेलो होतो. अनेकांनी आणि विशेषतः महाराष्ट्रातील जनतेने येथे भेट दयावी असे मला वाटते . परतताना नर्मदेचा घाट , एक जुने महादेवाचे मंदिर आणि  छावणीचे अवशेष बघायला मिळाले.  अगदी मनाप्रमाणे समाधीला भेट देऊन आम्ही पुढे निघालो ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्यांच्या " महेश्वरकडे " !

छावणीचे अवशेष 

नर्मदेचा घाट
 छोटेसे मारुतीचे देउळ 


 एक जुने महादेवाचे मंदिर

नर्मदेचे पात्र 


धरण प्रकल्प - मध्यप्रदेश 


समाधीस्थळातील संरचना 

पाऊल ट्रेकर्स 

नरेंद्र - रमाकांत - धवल - अभिनव - सचिन 


थोरले बाजीराव पेशवे यांचे समाधीस्थळ 

जोगेश्वरी लेणी - मुंबई

जोगेश्वरी लेणी -  मुंबई  मुंबई म्हणजे स्वप्नांचे शहर ! ह्या शहरात लोकं आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे पळत असतात. पण अश्या गजबजलेल्या शहरा...