Saturday, November 5, 2016

उंबरखिंड - ड्युक्स नोज (नागफणी) - Umberkhind + Dukes Nose (Nagphani)

उंबरखिंड - ड्युक्स नोज (नागफणी)
दिनांक : ३१ ऑक्टोबर २०१६ , दिवाळी पडावा , बलिप्रतिपदा


उंबरखिंड समरस्मारक ( विजयस्तंभ ) 
यंदाच्या दिवाळीची सुरुवात खूप छान झाली . डोंबिविली फडके रोडवरील जल्लोषानंतर सर्वजण श्रेयसकडे जमलो .खूप चर्चा झाली पण एका दिवसात करता येईल असा किल्ला सुचत नव्हता . अखेर रोहनने उंबरखिंड समरभूमीच्या भेटीचा पर्याय सुचवला. उंबरखिंडचा इतिहास अनुभवण्यास आणि ७ वर्षांनंतर उगवणाऱ्या कार्वीला पाहण्यास मी खूप उत्साही होतो . दूधसागर नंतर माझी ट्रेकवारी थांबली होती . पण ती पुन्हा सुरु झाली ते शिवाजी महाराज्यांच्या युद्ध सहभागाने पावन झालेल्या उंबरखिंडीत !




३० ऑक्टोबर  २०१६  लक्ष्मीपूजन : 
आम्ही ७ जण रात्री  कल्याण स्टेशनवर पोहोचलो . रात्री लोणावळ्यापर्यंत प्रवास करून कुरवंडे गावास पोहचायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ( नागफणी ) ड्युक्स नोजला  भेट देऊन उंबरखिंडीस जायचे असा जुजबी प्लॅन ठरला होता . कल्याणला रात्री ११.५५ च्या सुमारास साईनगर एक्सप्रेस पकडली . शिर्डीला जाणाऱ्या एका प्रेमळ परिवाराने त्यांची झोपमोड करून आम्हाला बसण्याची जागा दिली . थंडीचे दिवस सुरु झाल्याचे जाणवत होते . गप्पा मारता मारता लोणावळा कधी आले ते समजलेच नाही . त्या प्रेमळ  परिवाराचे आभार मानून आम्ही लोणावळ्यास उतरलो.
कोराई  देवी : देवीच्या गाभाऱ्यात आम्ही पहाटे विश्रांती केली . (कुरवंडे) 


लोणावळा आणि अपेक्षाभंग : 
मध्य रात्री उलटून गेली होती आणि थंडी मस्त भरून आली होती . प्रचंड भूक लागली होती . आत्ता लोणावळ्यास आलो म्हंणले तर "लोणावळा आणि मॅग्गी नाका " हे समीकरण नित्याचे जुळलेले ! खूप अपॆक्षा मनांत ठेवून आम्ही मॅग्गी नाक्यास मॅग्गी खाण्यास गेलो पण एरव्ही पहाटे ४ पर्यंत निरंतर चालू असणारा मॅग्गी नाका आज बंद ! अपेक्षाभंगाचा पहिला धक्का पचवतो ना पचवतो ते दुसरा धक्का पुढे आवासून उभा होता . कुरवंडेला जाण्यासाठी आम्ही एका गृहस्थाकडे चौकशी केली . त्यांनी जी माहिती सांगितली त्यामुळे आमची झोपच उडाली . त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आय . एन . एस . शिवाजी  ह्या नौदलाच्या प्रशिक्षण केंद्राने सुरक्षा कारणे मार्ग बंद केला आहे असे त्यांनी सांगितले. ते स्वतः वारंवार खूप वेळा गेले असल्याने त्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने आम्हाला परत खोपोली ते उंबरखिंड असे मार्गक्रमण करण्यास सांगितले . ऐतिहासिक वाटेने आपणास जाण्यास मिळणार नसल्याची जाणीव मनाला उदास करत होती . पण लक्ष्याकडे जाणाऱ्या सर्व वाटा धुंडाळायच्या आणि शेवटच्या लक्षापर्यंत पोहचायचेच हा ट्रेकिंगचा नियम अंगिकारण्याचे ठरले . पुढे जाऊन आमचा निर्णय यशस्वी झाला आणि आम्ही नियोजित मार्गानेच मोहीम पार पाढली. लोणावळा एस. टी . स्टॅण्ड  वर भरपेट पोटपूजा करून आम्ही मध्य रात्रीस ३ च्या सुमारास कुरवंडे गावास निघालो .
कोराई देवीचे मंदिर , कुरवंडे 


३१ ऑक्टोबर २०१६  दिवाळी पाडवा : 
पहाटे ४ !  देवाचेद्वार  सर्वांसाठी खुले असते याचा अनुभव कुरवंडेला पोहोचल्यावर आला. सर्व गाव साखरझोपेत असताना आम्ही पाहुणे कोराई  देवीच्या द्वारी आलो आणि मंदिराचे दरवाजे उघडे पाहून सुखावलो. कोराई  देवीचे आशिर्वाद घेऊन आम्ही विश्रांती घेतली . असे वाटले कि जणू देवीने आम्हास बोलावले आहे . कारण तसे नसते तर आम्ही कुरवंडे ऐवजी खोपोलीहुन आमची मोहीम सुरु केली असती .
धवलने पहाटे लवकर गावात बोलून उंबरखिंडीस जाणाऱ्या वाटेची पूर्ण माहिती कडून ठेवली होती. सकाळी पाडव्याचा सूर्योदय पाहत आणि पाऊल पाऊलचे अधिकृत पेय "चहा" घेत आम्ही ड्युक्स  नोजकडे प्रस्थान केले . अर्ध्या वाटेमध्ये रोहनला लक्षात आले कि त्याचा कॅमेरा हा कुरवंडे गावातच राहिला आहे . रोहनची पुन्हा मिनी ट्रेक झाली . अगदी नशिबाने त्याला पुन्हा कॅमेरा मिळाला . सर्वजण आय . एन . एस . शिवाजी  ह्या नौदलाच्या प्रशिक्षण केंद्राने घातलेल्या कुंपणाला समांतर चालू लागलो .
इंद्रायणी नदी उगमस्थान कुंड


ड्युक्स  नोज ( नागफणी ) : 
उंबरखिंडीच्या वाटेवरच असणाऱ्या ड्युक्स  नोजला भेट देऊन पुढे जायचे होते . प्रथम आम्हाला दर्शन झाले ते इंद्रायणी नदी उगमस्थान कुंडाचे ! हिवाळा चालू असल्याने कुंडातील पाणी आटले होते . पुढे लगेचच ड्युक्स नोजची टेकडी लागली. ड्युक्स  नोज हा रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग करण्यास प्रसिद्ध आहे . खोपोली स्टेशन , मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग , मुंबई पुणे रेल्वे मार्ग ह्या सर्व ठिकाणावरून सहज दिसणारा असा ड्युक्स नोज सर्व ट्रेकर्सला परिचित आहे . इंग्रजांच्या राजवटीत ‘ड्युक’ नामक इंग्लंडचा राजपुत्र हिंदुस्थानभेटीवर आला होता. त्याच्या सन्मानार्थ बोरघाटातील या कड्यास ‘ड्युक्स नोज’ हे नाव दिलं गेले असे अनेक ब्लॉगवरील माहितीत कळले .
नुकताच सूर्य डोक्यावर येत होता, आम्ही भर भर नागफणीच्या माथ्यावर पोहचलो .माथ्यावर शंकराचे मंदिर आणि स्वयंभू महादेवाची शिळा आहे .सुरक्षेसाठी रेलिंग लावल्या आहेत. माथ्यावरील दृश्य खूप सुंदर होते . जिथे नजर पोहोचेल तेथील नजारा नयनरम्य होता . समोर जुना व नवा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि लोणावळा शहर दिसत होते . थोडी बाजूला नजर सरताच रेल्वे मार्ग ठळकपणे दिसत होता.  सोसाट्याचा वारा शरीरातील क्षीणता दूर करत होता . आमचे लक्ष उंबरखिंडीच्या वाटेकडे होते . त्या वाटेकडे जाण्याचा मार्ग कसा असेल ह्याचे अंदाज आम्ही नागफणी वरून बांधत होतो . आय . एन . एस . शिवाजी  ह्या नौदलाच्या प्रशिक्षण केंद्राचा विस्तृत परिसर आणि त्याबाजूने जाणारी वाट आता आम्हाला खुणावत होती .


डावीकडून उजवीकडे - नरेंद्र - रोहन - अनिकेत - सोनल - धवल - अभिषेक - हरीश : नागफणी कडे जाताना 


ड्युक्स  नोज ( नागफणी ) आणि आजूबाजूचा परिसर : 
 नागफणीच्या उत्तरेला आहे राजमाची किल्ला आणि कोंढाणी लेणी आहेत .  तर दक्षिणेस आहे कोरीगड, सुधागड आणि सरसगड दिसतात .  पूर्वेस लोहगड , विसापूर , तुंग ,तिकोना हे किल्ले आहेत . पश्चिमेस माणिकगड, ईर्षाळगड, प्रबळगड आणि माथेरानचे पठार दिसते. आम्ही आज जिथे भेट देणार होतो ती दक्षिण बाजूस असलेली उंबरखिंड ही तर शिवकालीन इतिहासात खूपच प्रसिध्द आहे.
ड्युक्स  नोज ( नागफणी ) आणि आजूबाजूचा परिसर

प्रवास उंबरखिंडीचा : 
ड्युक्स नोजच्या परतीच्या वाटेवर लंडन वरून आलेला एक संघ आम्हास भेटला . परदेशी पर्यटक ही सह्याद्रीच्या प्रेमात आहेत हे पाहून बरे वाटले . पुढे आम्ही खिंड उतरण्यासाठी कंबर कसली .  आय . एन . एस . शिवाजी  ह्या नौदलाच्या प्रशिक्षण केंद्राने बांधलेल्या कुंपणालगतचा लगतचा रस्ता  आम्ही पकडला. गेल इंडिया कंपनीची एक गॅस लाईन ह्या मार्गतून गेली आहे . ह्या गॅस लाईनला धरूनच आम्ही उतरू लागलो. रस्ता चांगला आणि बांधीव आहे . एक सुंदर आणि चांगली गोष्ट म्हणजे वाट चुकू नये म्हणून भगव्या रंगाच्या रिबिन्स काही ट्रेकर्सनी  बांधल्या आहेत . ह्या वाट दाखवण्याऱ्या रिबिन्सचा आम्हाला खूप फायदा झाला .


भगव्या रंगाच्या दिशादर्शक रिबिन्स 

आम्ही सर्वजण १६६१साली येथे कसे वातावरण असेल आणि येथे प्रचंड तोफा - घोडे - डेरे आणि सैन्य घेऊन कारतलब खान कसा आला असेल ह्याचा अंदाज बांधत होते . मोठ्या लवाजम्यासोबत खिंड उतरणे ही साधी गोष्ट नव्हती .  दूरदृष्या शिवाजी महाराजांनी कारतलब खाणास ह्या वाटेने येणास भाग पाडले  असे स्पष्ट दिसत होते . आम्ही  आता एका पठारावर आलो होतो . अंतर कापता कापता इतिहासाचा मागोवा घेत होतो . वाटेमधेच आम्हाला एक छोटा ओढा लागला . तिथे आम्ही सर्वानी दिवाळीचा फराळ संपवला आणि थोडी विश्रांती घेतली . दुपारचे १२ वाजत आले होते आणि आम्हाला ती जागा पाहायची उत्सुकता होती जिथे महाराजांनी कारतलब खानच्या सैन्याचा धुव्वा उडविला . आम्ही पुढचा प्रवास लागलीच सुरु केला .
७ वर्षांनी फुलणारे कार्वीचे फुल 


आंबेनळी घाट ते अंबा नदी : 
ट्रेक म्हणले कि चढाई आलीच पण ह्या ट्रेकला एका हि क्षणी  चढाव लागला नाही . आम्ही उंच ठिकाण वरून खाली खाली उतरत होतो ते हि घनदाट जंगलात ! आम्ही आता आंबेनळी गावात आलो होतो . तिथे एक आजोबा आम्हाला मिळाले . त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करत अंबा  नदीच्या काठी पोहचण्याचा अचूक मार्ग दाखवला . आंबेनळी गावात लोकवस्ती खूप कमी आहे . तेथील विद्यार्थी वर्गाला शिक्षण साठी आंबेनळी ते कुरवंडे असा दीड  तासाचा पायी प्रवास करावा लागतो . आणि त्यांना जवळची बाजारपेठ लोणावळा आहे . या वरून आपल्या लक्षात येईल कि ह्या गावातील मंडळींचे जीवन हि रोज होणारी ट्रेक आहे . गावातील लहानग्या मुलांना शुभेच्छा देऊन आम्ही घाट उतरू लागलो . अजून खूप अंतर कापायचे होते आणि लक्ष दृष्टीक्षेपात नव्हते .

आंबेनळी गावातील आजोबा आणि त्यांची नातवंडे 

उतरताना मनाला आनंद देणारी गोष्ट म्हणजे ड्युक्स  नोजचा दिसणारा नागासारखा फणा ! ड्युक्स  नोज खूप मागे पडत चालले होते आणि त्या ठिकाणी आम्ही काही तासा पूर्वीच होतो हि गोष्ट आम्हा मध्ये चैतन्य निर्माण करत होती . जवळपास २२ किलोमीटरच्या प्रवासातील १५ किलोमीटर अंतर कापले असेल पण मागे वळून पाहताना ड्युक्स नोजला पदस्पर्श झाल्याचा आनंद फार छान होता . खरोखऱच ते नागाच्या फण्या सारखे आणि एका राजकुमाराच्या नका सारखे दिसत होते . अगदी थोड्या वेळातच आम्ही घाटावरून कोकणात उतरलो  . जेथे प्रत्यक्ष युद्ध झाले ती समरभूमी अजून  ६ किलोमीटर लांब होती . त्या समरभूमी स्मारकाकडे जाण्या पूर्वी आम्ही अंबा  नदीच्या पात्रात आमचा थकवा घालवला.
 ड्युक्स  नोज खूप मागे पडत चालले होते 

उंबरखिंडीचा इतिहास आणि गनिमी कावा :
कारतलब खानाकडे उत्तर कोकण जिंकण्याची आणि शिवरायांना पराभूत करण्याची जबाबदारी होती .कारतलब खानसोबत  रायबागन हि शूर महिला सरदार ही होती .  पुणे - तळेगाव - मळवली - लोणावळा  असा प्रवास करत तो बोरघाटामार्गे कोकणात येणार होता . पण शिवरायांनी पेणच्या अवतीभवती आपले सैन्य जमवायला सुरुवात केल्याची अफवा वजा बातमी खानाकडे आपल्या हेरांमार्फत परसरावली . महाराजांना लवकरात लवकर कोंडीत पकडावे म्हणून खानाने मार्ग बदलला आणि तो लोणावळा - कुरवंडे आणि आंबेनळी घाट मार्गे कोकणात येऊ लागला . हा सारा दाट जंगलाचा प्रदेश होता. खरे तर खानाचे सैन्य येण्या अगोदरच शिवाजी महाराजांनी आपले सैन्य कुरवंडा घाटामध्ये पेरले होते. खान कुरवंडा घाटातून उतरणार ही हल्ल्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट होती. कुरवंडा घाटातून अंदाजे दोन मैलावर चावनी नावाचे गाव आहे. इथून पुढचा मार्ग अत्यंत उताराचा आणि अगदी चिंचोळा. म्हणजे एका वेळी एकच माणूस अशा प्रकारे ‘एककतार’मध्ये जावे लागेल असा मार्ग. फेब्रुवारी महिन्यात  आंबा नदी कोरडी असते आणि त्याबरोबरच  नेताजी पालकरांनी घाट मार्ग वरील  पिण्याच्या पाण्याची कोंडी केली होती. राजांनी या नैसर्गिक स्थितीचा फायदा उठवला. चावनीपुढे आल्यावर अंबा नदीच्या वळणापाशी चढाव चढून अर्धापाऊण मैलावर उंबरे गाव आहे. चावनी ते उंबरे गावामध्ये असलेली मैलभर लांबीची दरी खिंडीसारखी आहे म्हणून तिला उंबरखिंड म्हणतात.  राजे स्वत: खिंडीच्या तोंडावर असणाऱ्या टेकडीवर सज्ज झाले.  खानाच्या सैन्याचा पसारा खूप मोठा होता. या चिंचोळ्या मार्गातून जाताना त्यांची पुरी दमछाक होत होती. सूर्य तळपत होता. वाटेत पाण्याचे दुर्भिक्ष आणि अचानक कर्णे वाजू लागले. खानाचे सैन्य व घोडे थबकले. काय झाले ते कळायच्या आत ‘हर हर महादेव’ची गर्जना खिंडीत घुमली आणि हल्ला झाला. मराठे कुठून मारा करताहेत तेच कळत नव्हते. खानाच्या सैन्याने मागे पळायचा प्रयत्न केला, पण मागची वाटही नेताजी पालकरांनी अडवली गेल्याचे आता लक्षात आले. शेवटी आक्रमक गनिमी काव्यामुळे  खान हतबल झाला आणि त्याने शरणागती पत्करली .  खानाच्या सैन्याची शस्त्रे, उत्तम वस्त्रे, डेरे-तंबू यांचे सामान, दागिने, घोडे, बैल इत्यादी प्राणी अशा गोष्टी तिथल्या तिथे सोडून खानाने हार पत्करली .
 
इथून पुढचा मार्ग अत्यंत उताराचा आणि अगदी चिंचोळा

२ फेब्रु. १६६१ रोजी मुघल अधिकारी कारतलब खान याच्या तीस हजार फौजेचा उंबरखिंड येथे केलेला पराभव ही गनिमी कावा युद्धतंत्राची उदाहरणे म्हणून सांगता येतात. फक्त १००० सैन्यदलाच्या साहाय्याने महाराजांनी कारतलब खानाच्या ३०,००० सैन्याचा पराभव केला .


उंबरखिंड समरभूमी 


उंबरखिंड समरभूमी : 
अंबानदीच्या पात्राला लागून जाणाऱ्या रस्त्यावर आम्ही चालू लागलो . आणि पुढे अर्ध्या तासावरच नदीच्या पत्रामध्ये उभे असलेलं स्मारक आम्हाला दिसले आणि माझे मन अभिमानाने भरून आले . ह्या समरस्मारकास एका बाजूला महाराजांचे आज्ञापत्र  आहे तर त्याच्या विरुद्ध बाजूस उंबरखिंडीचा संक्षिप्त इतिहास कोरला आहे . पुढील बाजूस शिवाजी महाराजांची कोरीव आकृती आहे तर त्यामागे समरस्मारक स्थापनेचा शिलालेख आहे.  ढाल - तालावर- भाला - धनुष आणि भगवा ध्वज असलेले ते स्मारक विजयश्रीचे स्वरूप आहे . आम्ही जिथे आहोत तिथे एक असामान्य आणि ऐतिहासिक लढाई झाली होती . त्या पुण्य भूमीवर आज आम्ही महाराजांचे आणि स्वराज्यातील मावळ्यांचे स्मरण करत होतो आणि त्यांना अभिवादन देत होतो . त्या जागेत विरता होती , शौर्य होते , पराक्रम होता आणि कुशल युध्य कौशल्य होते . समरभूमीचे स्मारक पाहताना क्षणोक्षणी महाराजांच्या पराक्रमाची आठवण येत होती . आपण ह्या महापुरुषाच्या पुण्यभूमीत जन्मलो आहोत ह्याचा सार्थ अभिमान वाटत होता .  या जागेवर येऊन मिळालेले समाधान खूप अवर्णनीय होते . वेगवान व सुनियोजित हालचालींनी अत्यंत कमी सैन्यबल असतानासुद्धा त्या काळी गाजवलेला पराक्रमाचे चित्र आमच्या समोर उभे राहत होते .
उंबरखिंड स्मारक विजयश्रीचे स्वरूप आहे

अनिकेत - अभिषेक - सोनल - हरीश - रोहन आणि धवल सर्वच भारावलेले होते . रोहनच्या शिव- घोषणेने वातावरण शिवमय झाले होते . आम्ही सर्वच ह्या प्रवासात खूप थकलो होतो परंतु समरभूमीस भेट देऊन एक वेगळंच बळ  आम्हाला मिळाले होते . प्रत्यक्ष युद्ध भूमीस आम्ही प्रणाम केला आणि आमच्या ट्रेकची सांगता केली . परतीचा प्रवास हा ह्या वेळी खूप सोपा नव्हता .शेवटचा ६ किलोमीटरचा स्मरस्मारक ते शेंबडी प्रवास आम्हाला पायी पायीच करावा लागला . पण आम्ही समाधानी होतो कारण आम्ही आज साक्षीदार झालो होतो ते माझ्या राजाच्या विजयश्री मिळवलेल्या युध्यभूमीचे !
मोहिमेचा शेवटचा टप्पा 

हर हर  महादेव !




गेल इंडिया कंपनीची  गॅस लाईन जी आपल्यास साहाय्य करते 
कोराईदेवी मंदिरा मध्ये 

शनिवार वाडा प्रतिकृती 

हर हर महादेव 

नागफणी - ड्युक्स  नोजच्या माथ्यावरील शंकराचे मंदिर  

नागफणी - ड्युक्स  नोज चा माथा 

आय . एन . एस . शिवाजी  ह्या नौदलाच्या प्रशिक्षण केंद्राने बांधलेल्या कुंपण

आंबेनळी घाटात 

उताराणीची वाट 

पेडिक्युअर 

समरभूमीचा इतिहास 

महाराजांचे आज्ञापत्र 

समरभूमी विजयस्तंभ उंबरखिंड 

समरभूमीचा इतिहास 

जोगेश्वरी लेणी - मुंबई

जोगेश्वरी लेणी -  मुंबई  मुंबई म्हणजे स्वप्नांचे शहर ! ह्या शहरात लोकं आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे पळत असतात. पण अश्या गजबजलेल्या शहरा...