माझा पहिला ट्रेक : कळसुबाई ट्रेक
१५ जुलै २०१२
भूगोल आणि कळसुबाई :
महाराष्ट्रातील सर्व्वोच्य गिरीशिखर म्हणून "कळसुबाई" चे आकर्षण लहानपणी पासूनच होत !
भूगोलाच्या पुस्तकातील प्राकृतिक नकाश्यांमध्ये सांकेतिक चिन्हांनी पर्वत रांगा , पठारे , घाट रस्ते , शिखरे , नद्या ,गड किल्ले दर्शवलेले असत. हि सांकेतिक चिन्हे प्रत्यक्षात कशी दिसत असतील ? तिथे जाण्याचा योग येईल का? कणखर आणि राकट सह्याद्री कसा असतो ? "त्रिकोण" चिन्हाने दर्शविलेले कळसुबाई शिखर हे त्रिकोणा प्रमाणेच सुळकेदार असेल का ? दोन नद्यांचा संगम कसा होत असेल आणि जिथे होत असेल "Y"
आकार दिसत असेल का ? असे अनेक प्रश्न मला पडायचे !
समुद्राला नदी येउन मिळते आणि तो निळाशार असतो असे वर्णन असायचे ! पण आमच्या मुंबई मध्ये असलेल्या अरबी समुद्रात कुठलीच नदी कशी येउन मिळत नाही आणि आपला समुद्र "काळाशार" कसा? ठाण्याची प्रसिद्ध खाडी तर एक मोठा नाला आहे मग ती प्रसिद्ध कशी? हे आणि असे अनेक प्रश्न मला सतत पडत असायचे .
जसा जसा काळ पुढे सरकत गेला तेव्हा खऱ्या घाटांचे , डोंगर माथ्याचे , पाठरांचे , गड किल्ल्यांचे दर्शन होऊ लागले. पुस्तकातील वर्णन आणि वास्तविक स्थिती ह्यांचे आकलन होऊ लागले. कळसुबाई शिखराबद्दल खूप आकर्षण होते. मुळात गड किल्ले , घाट रस्ते परिचयाचे होत होते परंतू शिखराला सर करायचा योग कधी आला नव्हता. घनदाट रान-राई आणि चढाई साठी कठीण शिखर असावे हिच माझी संकल्पना होती .
![]() |
पाऊल ट्रेकर्स |
"पाऊल ट्रेकर्स" स्थापना :
मला गड किल्ल्यांची आवड आहे हे माझ्या सोबत काम करणाऱ्या अक्षय ला माहित होते . एके दिवशी अचानक त्याने विचारले , "साहेब , कळसुबाई ला येणार का ?". मी लागलीच "हो" उत्तर दिले कारण शिखरावर जायचे होतेच. अकबर हि आमच्या सोबत येण्यास तयार होता. अक्षय मुळात डोम्बिविलीचा आणि त्याचा हि एक स्वच्छंदी ग्रुप आहे. त्या ग्रुप सोबत जायचे ठरले आणि तारीख हि ! "१५ जुलै २०१२ " ! ह्याच दिवशी त्या ग्रुप ने आपला स्वतः चा ट्रेकिंग ग्रुप तयार करायचे ठरवले ! त्या ग्रुप चा संस्थापक सभासद होण्याचे भाग्य मला लाभले.
त्या रात्री तब्बल ५० जणांचा घोळका डोंबिवलीतील "शिवाजी चौकात " होता. त्या ५० मध्ये २ हौशी मुली हि होत्या. गणपती बाप्पा चे नाव घेऊन आणि शिवरायांचा जयघोष करून आम्ही ग्रुप च्या नावाचे अनावरण केले. "पाऊल ट्रेकर्स" ! "पाऊल" नाव जितके मराठमोळ वाटत होते तितकेच समर्पक हि होते ! "पाऊले चालती पंढरी ची वाट …. " प्रमाणे आमची पाऊले कळसुबाई नावाच्या पंढरी कडे वळणार होती …. आणि या पुढे ही अनेक किल्य्यांचा आणि गिरिशिखरांचा वेध ती घेणार होती ! मॉल संस्कृतीत मधील झगमगाटा मध्ये रूळण्य़ापेक्षा वनराई मध्ये आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये रुळणारी हि सर्व मुले मला आपलीच वाटू लागली !
"जुगाड" तंत्र
आमचा गमतीदार प्रवास अखेर सुरु झाला ! पाऊल ट्रेकर्सचा प्रिंट फलक आम्ही ५२ आसनी वोल्वोच्या हेड लाईट खाली बांधला आणि वोल्वो गाडी समोर "श्रीफळ" फोडून प्रवासाला सुरुवात झाली ! सर्वजण अनोळखी असल्याने आपापल्या परिचित लोकांसोबत बोलत सगळे दंगा न करताच प्रवास करत होते.
आमची वोल्वो गाडी विशेष गाजली ती गाडीमध्येच वाहणाऱ्या धबधब्यामुळे ! एक बाजूने गळती लागलेली बाजू कशी बशी सावरून प्रवास सुरळीत सुरू केला . पण सुरळीत प्रवासाला पहिला ब्रेंक हा २ तासांच्या प्रवासावरच लागला ! आमची गाडी एका पेट्रोल पंपावर थांबली आणि ड्राईवर त्याच्या मदतनीसा सोबत पाने घेऊन दुरुस्थी काम करू लागला ! ते चित्र पाहून प्रकरण साधे नाही हे कळलेच होते ! " पोहोचण्या पूर्वीच हि हालत ! " असे संवाद जो तो येउन बोलू लागला ! "गाडी पेहले चेक क्यू नही किया ? " असा धमकी वजा प्रश्न हि ड्राईवर ला सगळे विचारू लागले. ! कारागीरांच्या भाषेत सांगायचे झाले तर "जुगाड" तंत्र वापरून ड्राईवरने गाडी सुरु केली ! त्याचे ते जोडणी कौशल्य पाहून मी शाशंक होतो, "मनामध्ये देवाच्या नावाचा धावा कर" असे हळूच मी अकबर ला सांगितले होते ! . पुढे इगतपुरीस येउन गाडी ग्यारेज मध्ये दुरुस्त केली. आणि गाडी अगदी निर्धोकपणे धाऊ लागली. धवल , श्रेयस , अमरेश, रमा ह्या ग्रुप मधील मुलांनी हि उत्तम प्रकारे सर्व संयोजन केले.
![]() |
ह्या गाडी ला कुणीही विसरू शकत नाही ! |
कळसुबाई ट्रेक आरंभ :
सगळे साखर झोपेतून जागे झाले होते, घोटी मार्गावरून भंडारदऱ्याकडे गाडी ने वळण घेतले होते. पावसाळी वातावरणाने सर्वत्र हिरवळ दिसत होती. पहाटे वातावरणात वेड लावणारा गारवा होता. धुके हि दाट होते. हळू हळू धुके कमी होऊ लागले. सृष्टी ने "हिरव्या रंगाचा शालू " पांघरून घेतला आहे असेच जणू वाटत होते. सगळ्यांनी आपले मोबाईल सज्ज ठेवले आणि मनोहर दृशांचे फोटो सर्व टिपू लागले.आपली पावसाळी पिकनिक अविस्मरणीय ठरणार ह्याची चाहूल लागत होती ! लवकरच आम्ही "बारी " ह्या बेस गावात पोहचलो. समोरच टोकदार म्हणता येणार नाही पण सर्वोच्य पर्वत भाग दिसत होता! समुद्र सपाटीपासून ५४०० फूट म्हणजेच १६४६ मीटर उंचीवर असणारे हे पर्वत शिखर खूप सुंदर दिसत होते ! गावातील एका शाळेजवळ आम्ही मस्त पोहे आणि गरमागरम चहा घेतला. थोडी विश्रांती केली. ओळखी आता वाढू लागल्या! सर्वजण उत्साही होते, १० जणांचा एक गट असे ५ गट आम्ही तयार केले.
निसर्गाचे नियम पाळत आणि डोंगर रांगांमध्ये प्रदूषण न करता ट्रेकिंग करायचे ठरले. प्लास्टिक च्या बाटल्या आणि प्लास्टिक पिशव्या फेकू नये आणि वाटेत प्लास्टिकच्या पिशव्या आणि कागद सापडले तर आपल्या स्याक मध्ये टाकून प्रदूषण कमी करण्यास हात भार हि लावावा असे ठरले. शाळा संपल्या नंतर पहिल्यांदाच पर्यावरण मोहिमेवर आलो आहे असेच वाटले. सहलीचा उद्देश फक्त मनोरंजन नसून संकृती आणि पर्यावरण जपणे हा हि होता ! "पाऊल " च्या अभिनव संकल्पनेचे सर्वांनी स्वागत हि केले.
![]() |
बारी गाव : येथूनच ट्रेकला सुरुवात होते |
एक एक ग्रुप सैनिकी तुकडी प्रमाणे पुढे सरकू लागला ! आपल्या क्षमते प्रमाणे सर्वांची पावले पुढे पडत होती. पूर्ण ग्रुप मध्ये कॉमर्स सी . ए . चे विद्यार्थी अधिक आणि तरुणाई चा उस्ताह ही दांडगा होता ! हसत खेळत अधून मधून पावसाची सर अंगावर घेत स्वच्छंद पाखरांप्रमाणे आम्ही त्या वनराईत पुढे जात होतो ! जवळच एक छोटा ओढा आम्हास लागला , तो पार करून आम्ही आता चिखलाची वाट तुडवत चढण चढण्यास सुरुवात केली. गाव हळू हळू मागे जाऊ लागले. सर्वानमध्ये खेळीमेळी चे वातावरण होते ! आता एकमेकांना नावाने ओळखू लागलो होतो ! तासाभराच्या अंतरावर एक छोटेखानी पठार आले. तिथून आम्हाला विलोभनीय नजरा दिसत होता ! पांढरे शुभ्र धबधबे आणि रिमझिम पाऊस असे सुंदर वातावरण होते . आजूबाजूची हिरवळ हि मोहून टाकणारी अशी होती. अजून बराच पल्ला बाकी होता !
"अजून किती अंतर चालायचे आहे ? " ..... " हा समोरचा डोंगर पार केला कि पोहचलोच ! "
![]() |
रोहन - रमाकांत |
![]() |
अश्या अनेक शिड्या आपल्याला शिखरावर जाण्यास मदत करतात |
प्रवास दमछाक करणारा असून सुद्धा मन मात्र ताजे तवाने होते ! ह्या प्रवासात आमच्या सोबत एक कुत्रा हि आला होता ! आमच्या ग्रुपने " मोती " असे नावही त्याला ठेवले ! आता पाऊस जोर धरू लागला होता ! धुके अचानक दाट झाले होते. ओलांडलेले डोंगर आता ठेंगणे वाटत होते ! दाट धुक्यांमध्ये ते हळू हळू नाहीसे होत जात होते ! कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ता निसरडा होत चालला होता ! दाट धुक्यातली ती पाऊलवाट जणू जादुई स्वप्ननगरीत जात आहे असेच वाटत होते ! ढगांमध्ये चालणे किती अल्लाहदायक असते हे मी अनुभवत होतो ! खरेच खूप छान वाटत होते निसर्गाच्या सान्निध्यात! एकमेकांना मदतीचा हात पुढे करत गर्द वनामध्ये अखंड पायपीट करताना आपण इतके मोठे अंतर कापून पुढे जात आहोत ह्याचा आनंद चेहऱ्यावर व मनामध्ये वाहत होता !
![]() |
मस्ती आणि धमाल |

फोटो काढत , आजूबाजूच्या सौंदर्याचे आपापल्या शब्दात वर्णन करत आम्ही धमाल करत होतो ! आमच्या पुढे किती जण आहेत आणि मागे किती ह्याची आम्हाला काळजी नव्हती, आम्ही आपले आमच्या धुंदीत एकमेकांची टेर उडवत चाललो होतो ! एका भल्या मोठ्या कातळा खाली वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी हि पियालो , त्याची चव हि गोड होती !
आता शेवटच्या पठारावर आम्ही होतो. भांडारदऱ्याचा परिसर खूप छान दिसत होता ! धुके वाऱ्यासोबत वाहत होते ! शिखर माथ्यावर पोहचण्यास जास्त वेळ लागणार नव्हता. शेवटची शिडी चढून आम्ही महाराष्ट्रातील सर्वोच्य ठिकाणावर येऊन पोहलो ! माथ्यावरील भगव्या रंगाचे छोटे मंदिर पाहून जाणवले कि आपण लक्ष्य गाठले ! हात वर करून लढाई जिंकल्याच्या आवेशामध्ये आम्ही जल्लोष करू लागलो ! एकमेकांना मिठी मारून , एकमेकांशी हस्तांदोलन करून आणि एकमेकांना शाबाशकी देऊन आनंद साजरा करू लागलो ! लक्ष्यपुर्तीचे हास्य सर्वांच्या चेहऱ्यावर होते ! ५० जणांच्या चमू मधील अनुभवी मित्रांसाठी यशस्वी मोहिमेचा अभिमान होता तर नवख्या विध्यार्थ्यांच्या देहबोलीत एका प्रकारचा आत्मविश्वास मला दिसत होता ! एकमेकांना "हाई-फाई" टाळ्या देत सर्व जण एकमेकांचं अभिनंदन करत होते ! सर्व जणांनी शिखरस्वामिनी "कळसूबाईचे" दर्शन घेतले ! प्रथेप्रमाणे शिवरायांचा आणि शंभू महादेवाचा जयघोष केला ! एकत्र बसून सर्वांनी स्नेहभोजन केले आणि थोडा वेळ प्रत्येकजण त्या भारावलेल्या वातावरणात गढून गेला !
![]() |
शिखरस्वामींनी कळसुबाई देवीचे मंदिर |
सह्याद्रीचे रक्षण करणाऱ्या कळसुबाई चे दर्शन घेत तिचे आभार मानले ! माझे एक स्वप्नच जणू तिच्या आशीर्वादाने पूर्ण झाले होते ! तिची जशी सह्याद्रीवर कृपा आहे तशीच आम्हा सर्वांवर असू दे अशी मनोकामना व्यक्त केली ! शिखरावर सोसाट्याचा वारा मनाचा थकवा दूर करत होता ! शिखरावर बांधलेल्या रेलिंग जवळ मी उभे राहून सर्वोच्य ठिकाणी असलेल्या वास्तवाचे दर्शन घेत होतो ! ह्या ठिकाणावरून चहुबाजूला दिसणाऱ्या सह्याद्री च्या रांगा विलोभनीय दिसत होत्या ! ह्या राकट पर्वत प्रदेशाचा मी अंश असल्याचा मला अभिमान वाटत होता ! डोळे बंद करून त्या भन्नाट वाऱ्याचा विलक्षण अनुभव घेत होतो ! मनात शिखर भेटी इतकीच एका गोड भेटीची आठवण येत होती ! त्या क्षणी मी वेगळ्याच विश्वात अंतर्मुख झालो होतो ! डोळे उघडले तेव्हा ते पाणावलेले होते ! पाणावलेल्या डोळ्यां मागील कारण मला कळून चुकले होते ! स्वतःशीच एक स्मित हास्य करत पुन्हा ट्रेक प्रवाहात सहभागी झालो !
![]() |
टीम पाऊल : कळसुबाई शिखरावर |
परतीचा प्रवास :
आमचा परतीचा प्रवास सुरु झाला ! परतीचा प्रवास खूप मजेशीर झाला ! घसरण-सावरासावरी आणि खूप सारे विनोद ह्यांनी परतीचा प्रवास अविस्मरणीय ठरला ! राधिका - मैथिली ह्यांनी तर कठीण वळणे हि मोठ्या हिमतीने आणि जिद्दीने पार करत " हम किसी से कम नहि ! " हे दाखवून दिले.
![]() |
मस्ती आणि दोघींना सावरत सावरत आणण्यामुळे आमचा परतीचा प्रवास खूपच "कासव छाप " होता ! …आम्ही सर्वात शेवटी शाळेजवळ आलो ! लेट आल्या कारणाने सगळ्यांनी आमचे टाळ्या वाजवून मिश्किलपणे स्वागत केले, त्या स्वागताला तितकेच मिश्किलपणे आमच्या अष्टकोनी मंडळाने प्रतिसाद दिला . .
. सकाळी ९ वाजता सुरु केलेला प्रवास सायंकाळी ४. ३० वाजता संपला ! नंतर जवळच राहणाऱ्या काकूंना जेवण बनवण्यास सांगून आम्ही विश्रांती घेतली ! भूक हि खूप लागली होती … बनवलेले चविष्ट जेवण तीन पंगतीत जेवून सगळे पुन्हा शाळेजवळ सुस्त पडून राहिलो ! सगळेच ट्रेक चा अनुभव एकमेकांशी शेअर करत होतो ! सगळेच खुश होते ! कळसुबाई शिखराला शेवटचा प्रणाम करून आम्ही पुन्हा गाडी मध्ये बसलो ! परतीच्या प्रवासात मात्र सर्वांची नावे माहित झाली होती ! मराठी हिंदी गाणी म्हणत आम्ही घराच्या प्रवासाला सुरुवात केली ! अनेक जुनी नवीन गाणी म्हणत आम्ही भेंड्या खेळत होतो ! अभि -अंबर ह्यांची जुगलबंदी हि मस्त जमली होती ! "पाऊल"ची पुढची रूपरेषा ठरवत आणि गाण्याच्या भेंड्या खेळत कधी डोंबिवली गाठली हे समजलेच नाही !
धवल , श्रेयस , रमाकांत (रमा), अमरेश ह्यांनी हि खूपच मेहनत घेतली ! अनेक चांगले नवीन मित्र , अनेक चांगल्या आठवणींनी भरलेली हि ट्रेक खरेच संस्मरणीय होती ह्यात शंकाच नाही !