Thursday, June 2, 2016

सिद्धगड किल्ला (काजवा ट्रेक) / Siddhagad Fort

सिद्धगड किल्ला (काजवा ट्रेक)  
२८- २९ मे २०१६ 
 सिद्धगड किल्ला

२०१२ साली पावसाळ्यात गोरखगडाच्या मध्यावर आल्यानंतर दिसलेला सिद्धगड मनात घर करून राहिला होता. पांढरे शुभ्र वाहणारे धबधबे , अजस्त्र , विस्तीर्ण आणि  हिरवागार असा सिद्धगड प्रत्यक्षदर्शी कसा असेल ह्याची मी फक्त कल्पना करत असे . या गडावर आपण नक्की जाऊ अशी खात्री होती पण योग जुळून आला तो "काजवा ट्रेक " ह्या संकल्पनेतून ! मॉन्सून पूर्व काळ हा काजव्यांचा संक्रमणाचा काळ असतो.  मॉन्सून पूर्व पाऊस पडल्यावर काजवे आपल्याला दिसू लागतात . मे महिन्याचा शेवट आणि जुन महिन्याची सुरुवात ही काजवे दिसण्याचा चांगला कालावधी असतो . म्हणून आम्ही सिद्धगडला जाण्याचे ठरवले . 
सिद्धगड


२८ मे २०१६ : 
१३ जणांची एक टीम सायंकाळी ६ वाजता कल्याण पासून मुरबाडकडे  निघाली. सचिन लांडेने आधीच गाडीची व्यवस्था करून ठेवली होती . मुरबाड ते म्हसा असा प्रवास ही निवांत झाला . ट्रेक चहा घेतल्याशिवाय सुरु तरी कशी होणार ? !….  म्हसाच्या चौकावर मस्त चहा आणि गरम वडे फस्त करून आम्ही निरवली गावात पोहचलो  ! रात्री ट्रेक करायचा म्हणजे हरवण्याची शक्यता जास्त होती . त्यात सिद्धगडाचे जंगल खूप गर्द असल्याने आम्ही वाटाड्या सोबत घेण्याचे ठरवले . गावातील चंद्रकांत आणि त्यांचे एक मित्र आमच्या सोबत येण्यास तयार झाले . 
माहिती फलक 

सिद्धगड हा आहुपे - भिमाशंकर पर्वत रांगेतील किल्ला आहे .  ९ व्या शतकात शिलाहारांनी हा किल्ला बांधला होता . समुद्र सपाटीपासून ३२३२ फुटावरील ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत . 
मार्ग १ :  कल्याण - मुरबाड - म्हसा - नारीवली -सिद्धगडपाडा - सिद्धगडवाडी - सिद्धगड बालेकिल्ला 
मार्ग २ : कल्याण - मुरबाड - म्हसा - बोरवाडी - सिद्धगडवाडी - सिद्धगड बालेकिल्ला 

प्रवासाची सुरुवात आणि तुटलेला तारा : 
सिद्धगडास जाण्यासाठी आम्ही नारिवली - सिद्धगडपाडा मार्ग निवडला होता . ट्रेक सुरु करण्यापूर्वी आम्ही चंद्रकांत ह्यांच्या घरी थोडी विश्रांती घेतली . टीम मध्ये काही नवीन मंडळी शामिल झाली होती . हसत खेळत सर्वांशी ओळख ही  झाली . रात्री सुमारे ९ वाजता किरर्र अंधारात आम्ही ट्रेक सुरु केली . लवकरच एका नदीच्या पुलाजवळ आम्ही थांबलो . पुलाजवळ दोन पाण्याचे नैसर्गिक खळगे तयार झाले आहेत. त्यात अगदी उन्हाळ्यातही  पाणी असते . 
मंद गार वारा आणि वर दिसणारे तारांगण आम्ही खूप वेळ न्ह्याहाळत होतो. अचानक एका तुटलेल्या ताऱ्याचे दर्शन मला आणि सोनलला झाले. असा निसर्गाचा चमत्कार सिमेंटच्या जंगलात दिसणे तसे अवघड . पण तुटलेला तारा दिसणे एका प्रकारे शुभ लक्षण आहे असे सोबतच्या काकांनी सांगितले ! पण दर वेळी प्रमाणे ह्यावेळी हि मनातले काही मागायचे राहिले . अहो मागणार तरी कसा ? काही सुचायच्या आतच तो तारा अनंतात विलीन झालेला असतो :) पण श्रद्धाळू माणसाप्रमाणे तुटलेला तारा गायब झाल्यानंतरही मी मनातले मागून घेतले . विश्वास नसताना पण माणूस कधी कधी फिल्मी होतो :) मी पण त्यातलाच एक !  बाजूलाच सोनल भलतीच खुश होती . तिने जाहीर केले कि माझ्या आत्ता पर्यंत ३ इच्छा पूर्ण झाल्या आहेत . ती असे म्हणाल्यावर यश चोप्रा ह्यांच्या चित्रपटांचा प्रभाव फक्त माझ्यावरच झालेला नाही असे मला कळले ! 

मी : सिद्धगडाच्या बुरुजावर 
शेवटी वाट चुकलोच …  ! : 
नदीचा पूल पार करून पुडे सिद्धगडपाड्या वरील शेवटच्या घरापर्यंत पोहचलो. घराचे मुख्य गृहस्थ खूप हसमुख आणि मायाळू होते . आमच्या सोबत मुली असल्याने त्यांनी जपून जाण्याचा सल्ला दिला . अभिमानाने आमची प्रशंसा करत आम्हाला प्रवासासाठी शुभेच्छा हि दिल्या . गावातील माणसे अनोळखी माणसांना हि आपलेसे करून सोडतात . 
आता टेकडी सुरु झाली .वाटेवर अनेकदा विंचू - कोळी - गोम दिसत होते . सर्व निशाचरांकडे कुतूहलाने पाहून पुढे जात होतो.  थोडे फार अंतर कापल्यावर आम्ही एका पठारावर विसावलो . आभाळ आता भरून येत होते . काजव्यांची झलक हि दिसू लागली होती . अस्पष्ट पण उत्तुंग काळ्या आकृत्या डोळ्यासमोर अल्यानंतर समजले की अजून बरेच अंतर कापायचे आहे . डावीकडे अहुपा , मध्यभागी दमदम्या आणि उजवीकडे सिद्धगड उभे होते . थोडावेळ थांबून आम्ही पुन्हा प्रवास सुरु केला . 
मळलेली पायवाट जिथ पर्यंत जात आहे तिथ पर्यंत आम्ही अवांतर अंतर पार केले . शेवटी पायवाट एका सुकलेल्या ओहोळास येउन संपली . आता आम्हाला कळून चुकले होते कि आम्ही वाट भटकलो आहोत . श्रेयस आणि धवल ह्यांना पूर्वी ही असे अनुभव आल्याने ते अश्या प्रसंगाला अगदी नेटाने समोर जातात.धवल श्रेयस आणि लांडे ह्यांनी हार न मानता पुन्हा उलटा प्रवास सुरु केला. आम्ही ही त्यांसोबत चालू लागलो.  आडवाटेने जाताना रस्ता हा चुकतोच पण त्या मुळे  नव्या वाटा सापडतात . हा क्षण हि असाच होता . आहुपे - गायधारा - भीमाशंकर ह्या घाट  वाटेचा रस्ता आम्हाला मिळाला :) 

चंद्रकांतला अलविदा आणि सिद्धागडाची कमान :
वाट भटकलो आणि पुन्हा योग्य वाटेस येउन जुळलो . पुढे आम्ही एका सुकलेल्या ओढ्या पाशी आलो. चंद्रकांत आणि त्याच्या सहकाऱ्याला आम्ही येथे अलविदा केला. त्या दोघांचे आम्ही आभार मानले . त्यांच्या घरी घेतलेला चहा आणि त्यांचा काळजीवाहू स्वभाव आमच्या नक्कीच लक्षात रहिल. 
येथून पुढे आम्हालाच गड सर करायचा होता. सिद्धगडवाडीला जाण्याआधी एक महादरवाजा आहे .  गावकरी त्यास कमान म्हणतात .  वाट खडतर होती . सर्वजण  थोडे थकलो ही  होतो .काळोख्या रात्री चालता चालता  रफ्तार कमी झाली होती आणि कमान काही दृष्टीस दिसत नव्हती. " कमान अजून किती दूर आहे ? " असा प्रश्न येत होता आणि माझे प्रत्येकवेळी एकच उत्तर असायचे , " फक्त १५ मिनिट " :) पण एका अनपेक्षित वळणावर १५ मिनिटे संपली आणि महादरवाजा जवळ आला . सगळेच आनंदी झाले .  
कातळी जोडणीचा महादरवाजा बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.रात्रीचे ३ वाजले होते. वेध लागले होते ते काजव्यांच्या लखलखाटाकडे !
सिद्धागडाची कमान
काजव्यांचा खेळ :
सिद्धगडास निमित्त ठरणारे काजव्यांचे दर्शन मनाला हवे तसे झाले नव्हते . पण महादरवाजा पार केल्यानंतर हिरव्या रंगाच्या मंद प्रकाशाने चमकत असणारे असंख्य काजवे दिसू लागले . जंगलात फिरत असताना बरेच काजवे झाडावर चमचमताना दिसले . सायली, भाग्यश्री ह्यांची काजवे पाहण्याची पहिलीच वेळ ! त्यांनी काजवे अगदी हातावर हळुवार घेऊन आपली इच्छा पूर्ण केली . काळ्या कुट्ट अंधारात लुकलुकणाऱ्या काजव्यांची रोशनाई पाहण्याची मज्जा वेगळीच ! " पूर्ण जंगल भरत काजव्यांनी" असे सिद्धगडपाड्याचे आजोबा म्हणाले होते पण जे दृश आम्हाला दिसले त्यातच आम्ही खूप खुश झालो होतो ! बराच वेळ आम्ही ते दृश्य डोळ्या मध्ये साठवत होतो. फोटो काढण्याचा मोह अर्थात झाला पण ते शक्य झाले नाही . 

काजव्यांच्या लुकलुकण्याचे तथ्य : प्रजनन काळात नर आणि मादीला एकत्र आणण्यासाठी प्रकाश उपयोगी पडतो. नराचा विशिष्ट रीतीने चमकणारा प्रकाश त्याच जातीच्या मादीला अनुरूप वाटल्यास ती प्रकाशून प्रतिसाद देते आणि मीलन घडून येते. 

सिद्धगडवाडी आणि पहाटचेचा सिद्धगड :
शेवटी एक पाडाव पार केला . सिद्धगड माची म्हणजेच सिद्धगडवाडी मध्ये आम्ही पोहोचलो . मध्य रात्री शाळेसमोर आम्ही जेवण संपउन लागलीच एका घराच्या पडवी मध्ये झोपी गेलो. पहाटे उठल्यावर पहिले तर बालेकिल्ला पूर्ण मेघांनी अच्छादित होता . सकाळचे वातावरण प्रसन्न होते . 

मेघांनी वेढलेला सिद्धगड
सिद्धगडावरील शाळा
" सिद्धगडवाडी " : १०- १५ घरांचा समूह, २ विहिरी  आणि एक शाळा असलेले स्वप्नवत गाव!  कुडाच्या लाकडाच्या भिंती , शेणाने सरावलेले अंगण आणि अंगणाच्या बाजूला गोठा असे प्रत्येक घराचे रूप होते . एवढ्या उंचीवर मनोरंजनाची काही साधने नसताना सर्वजण कसे राहत असतील असा प्रश्न कुणालाही पडेल . आजूबाजूला असलेले निसर्ग वैभव सोडले तर राहणीमान तसे प्रतिकूलच आहे . पण त्या वाडीतील गावकऱ्यांचा जीवनाशी झुंजण्याचा दृष्टीकोन आपल्या पेक्षा कणभर सरस आहे हे नक्की !  

अनिकेत : एका अवघड वाटेवर 
सिद्धगड बाले किल्ला : 
सकाळी ८. ३० ला राणातील करवंद खात खात आम्ही बालेकिल्ला चढाईस सुरुवात केली. सह्याद्री मध्ये ट्रेक करताना जे विहंगम दृश दिसते त्याला सिद्धगड ट्रेक हा अपवाद नाही. जबरदस्त आणि आकर्षक नजारे दिसत होते . गडाची चढण कठीण आणि आव्हानात्मक होती. सर्वच खूप मज्जा करत होते . निळ्या आकाशातील पांढरे शुभ्र ढग , उजवीकडे असलेले  गोरखगड व त्यावरील छोटेसे मंदिर - मच्छिंद्रगड , सिद्धगड लिंगी आणि खाली इवल्या इवल्या घरांची सिद्धगडवाडी असा नजरा  अतिशय सुंदर होता . 
गडावरील पोहचण्याचा आनंद ही  खूप होता . सरते शेवटी आपण येथे आलो ही  भावना खूप छान होती . बोरवाडी आणि सिद्धगडवाडीचा परिसर न्याहाळणे हि सुखदायक होते .बुरुजा जवळ सर्वांनी  मस्त फोटो सेशन केले . श्रेयसने दिलेल्या शिव घोषणेचा  आणि शिवरायांच्या जयजयकाराचा आवाज पूर्ण सिद्धगडवर घुमत होता .  

पाणी (जगण्याची अंतःप्रेरणा) :
सिद्धगड ट्रेकला एक अनुभव आला तो म्हणजे कुणी किती ही सांगितले कि गडावर पाणी आहे तरीही आपल्याकडे पाणी असने आवश्यक आहे . उतरताना आमचा पाण्याचा साठा संपला होता.  आमच्या पैकी  अनेकजण तहानलेले खाली उतरले.  मी लांडे - तुषार - हरी आणि भागाश्रीने  चक्क शेवाळे असलेल्या टाक्यातील पाणी पिले . खरेच पाणी हि जगण्याची अंतःप्रेरणा आहे हे आम्हाला समजले . 

गडावर काय आहे ? : 
गडावर जाताना सर्व प्रथम सिद्द बाबांची गुहा येते . आजूबाजूलाच ३ पाण्याची टाके आहेत . पुढे एका गावातील गृहस्थाच्या स्मरणार्थ बांधलेले तुळशी वृंदावन आहे . थोड्याच वेळात आपल्याला अजून एक छोटी कपारीतील गुहा लागते . नंतर बांधीव पायऱ्या  लागतात . सरते शेवटी आपण गडाच्या माथ्यावर पोहचतो . 

गडमाथ्यावर शंकराची पिंड आहे आणि सोबत नंदी ही आहे . गडावर ५-६ पाण्याची टाके आहेत पण त्यात उन्हाळ्यात पाणी नसते. गडाच्या एका टोकावर गोलाकार बुरुज आहे आणि तिथेच एक द्वार आहे जे निसर्गाच्या माऱ्याला तोंड देत आहे . या द्वारापासून चढाई करणे काठी आहे असे गावातील मंडळीनी नमूद केले . गडाच्या दुसर्या टोकावर एक पडलेल्या वाड्याचे अवशेष आहेत . 

बोरवाडी  येताना वीर हुतात्मा कोतवाल आणि हिराजी पाटील ह्या स्वतंत्रवीरांचे स्मारक आहे . 

हर हर महादेव 
शेवटचे टोक 
 गावातील गृहस्थाच्या स्मरणार्थ बांधलेले तुळशी वृंदावन
सिद्ध बाबा गुहे जवळ : लांडे साहेब 
इतिहास : 
* १६९० पर्यंत हा किल्ला शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्यात होता असे मानतात . 
* गडावरील गुहा १००० वर्षा पूर्वीची आहे , त्यामुळे शिलाहारांनी हा किल्ला बांधला असे हि म्हणले जाते 
* पेशवाई काळात  वसईच्या स्वारीत ह्या किल्ल्याचा विश्रांती साठी उपयोग केला आहे . 
* १८१८ साली जवळच्या दमदम्या डोंगरावरून सिद्धगडाच्या पायऱ्या तोफेने उडवण्यात आल्या . दमदम्या डोंगर परिसरात अश्या तोफा पडल्या आहेत असे गावकरी म्हणतात . 
* सिद्धगडला खरी प्रसिद्धी आली ते हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील  ह्यांच्या बलिदानामुळे . भूमिगत असताना ते सिद्धगडावर होते . त्या काळी त्यांना पकडून देणाऱ्यास २५०० रुपये इनाम होता . सिद्धगड धबधब्याजवळ ब्रिटीश अधिकारी हॉल ह्यांनी त्यांना गोळ्या झाडल्या . तिथे त्यांचे एक स्मारक हि आहे 

परतीचा प्रवास - 
आधी दुपारचे जेवण करून घेतले . जेवताना ही गप्पा गोष्टी रंगत होत्या . तुषारने ह्यावेळी सर्वांना  पौष्टिक आहार भेटेल असे जेवण आणले होते . जेवताना सर्वजण आप आपले अनुभव सांगत होते. दुपारचे जेवण आटोपून आम्ही परतीची तयारी सुरु केली . वाडीतील विहिरीवर आंघोळ करून आम्ही सर्व ताजे तवाने झालो होतो. उन्हाळ्यामध्ये थंडगार पाण्यात अंघोळीचा आनंद सर्वांनी घेतला . 
वाटेतील आंबे - करवंद खात बोरवाडीकडील मार्गाने आम्ही उतरण्यास सुरवात केली . काही अवघड उतार ह्या वाटेला असल्याने उतरताना सर्वांनी एकमेकांना सांभाळून घेतले . 
परतीच्या वेळी ज्या आजींकडे आम्ही राहिलो होतो त्यांचा मुलगा आणि काही गावातील कुटुंब आम्हाला भेटली . भली मोठी धान्यांची पोती घेऊन , पोराबाळासोबत सर्व जन जात होते. खुशाली विचारून आम्ही त्यांचा निरोप घेतला . आमची ट्रेक खरे तर त्यांचे रोजचे जीवन होते. सिद्धगडवाडीतील सर्व कुटुंबाना मनोमनी सलाम केला . 
करवंद 

पाउल ट्रेकर्स :  विग्नेशा - सायली - अभिनव - राहुल - लांडे - मी - भाग्यश्री - सोनल
पाठीमागे : हरिदत्त - धवल - श्रेयस , बसलेला : अनिकेत , क्लिक बाय - तुषार
मित्रांची साथ  : 
ट्रेक मध्ये सर्वात शेवटी राहून अभिनव - तुषार ह्यांनी ट्रेकच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत सर्वांवर लक्ष ठेवले आणि सर्वांना सोबत ठेवले . विग्नेशाने चांगल्या ट्रेकचा ध्यास धरला आहे , तिचा पाय दुखत असताना ही खूप धैर्याने तिने ट्रेक पूर्ण केली . विग्नेशा नक्कीच रौप्य मोहोत्सव करेल असे वाटते . सायली हि तशीच बिनधास्त आणि पावरफुल मेंबर आहे अनेक वेळा ती सर्वात पुढे असायची . हरिदत्त आणि भाग्यश्री ह्यांची आमच्यासोबत पहिली ट्रेक पण त्यांनी असे जाणवू दिले नाही कि ते पहिल्यांदा आमच्या सोबत येत आहेत . अनिकेत - राहुल - सोनल हे पण नियमित ट्रेक मेंबर झाले आहेत त्यान सोबत मागील ट्रेकची चर्चा होताच असते . धवल (१०० + ट्रेक )  - श्रेयस (५० + ट्रेक ) - लांडे (धडाडीचे कार्यकर्ते ) ह्यांबद्दल काय सांगावे ! हे तिघे असताना आपण निवांत ट्रेक करू शकतो . किल्ले - निसर्ग ह्यांसोबत  ट्रेक संस्मरणीय बनतो ते फक्त आपल्या सोबत असणाऱ्या मित्रांमुळे. मित्रांची सोबत नेहमीच आठवणीत राहणारी असते . 

सिद्धगड ट्रेक टिम : 
धवल , श्रेयस , सचिन लांडे , तुषार , अभिनव , अनिकेत ,  विग्नेशा , सोनल , सायली , हरिदत्त , भाग्यश्री ,राहुल ,  नरेंद्र . 
सिद्धगड ट्रेक टिम : बुरुजाकडील दरवाजा जवळ 

हर हर महादेव !
इतिश्री . 









तुषार @ सिद्धगड


गुहा क्रमांक २ : सिद्धगड

तुषार : सिद्धगडावरील दरवाज्याजवळ 



सिद्धगडवाडी 

टी टाईम 

विग्नेशा - सायली - सोनल - भाग्यश्री 


शुभ्र - निरभ्र 

सिद्धगडाच्या मध्यावर 

सिद्धगडाच्या मध्यावर 


गोरखगड - आहुपे 

सिद्ध बाबा गुहे जवळ : सेल्फी 

सिद्ध बाबा गुहे जवळील  पाण्याचे टाके : १

सिद्ध बाबा गुहे जवळील  पाण्याचे टाके : २

नंदी महाराज 

 बोरवाडी परिसर 


गडावरील पाण्याचे टाके : २

गडावरील पाण्याचे टाके : २

गडावरील पाण्याचे टाके : ३-४ 

बुरुजाकडील दरवाज्याजवळ पाउल टीम 

नरेंद्र 

श्रेयस आणि विग्नेशा 

भाग्यश्री आणि सोनल 

धवल : ट्रेक लीडर - पाउल ट्रेकर्स 

अनिकेतराव रोकडे साहेब : सिद्धगडवाडी 

सायली आणि सचिन : क्लिक टाईम 

सायली : सिद्धगड 

अभिनव - तुषार- लांडे 

जोगेश्वरी लेणी - मुंबई

जोगेश्वरी लेणी -  मुंबई  मुंबई म्हणजे स्वप्नांचे शहर ! ह्या शहरात लोकं आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे पळत असतात. पण अश्या गजबजलेल्या शहरा...