"किल्ले नरनाळा…. एक विदर्भातील किल्ला ! ( तालुका -आकोट , जि. अकोला) "
विदर्भातील आणि सातपुडा पर्वत रांगेतील किल्ल्यास भेट देण्याची माझी हि पहिलीच वेळ ! किल्ल्याचा इतिहास वाचल्यावर तो पाहण्याची उस्तुकता अजून वाढली ! "Where History Meets Nature" असे बिरुद असलेला हा किल्ला " निसर्ग आणि इतिहास" ह्यांचा सुरेख मेळ घडवून आणतो ! मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हा किल्ला अकोला पासून ६६ किमी अंतरावर आहे !अकोला ते आकोट असा एस. टी . प्रवास करून पोपटखेड मार्गे खाजगी ऑटो ने नरनाळा अभयारण्यात जाता येते .
 |
महालक्ष्मी दरवाजा : वास्तू शास्त्राचा उत्तम नमूना ....इ.स. १४८७ मध्ये हा शिलालेख कोरलेला आहे , : You can see marvelous Calligraphic Persian letters on Gate |
गडाच्या खाली शहानूर नावाचे गाव आहे म्हणून नरनाळा किल्ल्यास "शाहनूर किल्ला " असे ही म्हणतात ! नरनाळा किल्ला हा तीन किल्ल्यांचा संच आहे. "जाफराबाद - नरनाळा - तेलीयागड ". तेलियागड आणि जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे "जाफराबाद " आणि "तेलिया " किल्ल्यावर जाण्यास मनाई आहे . वन्यप्राणी आणि आपल्या सुरक्षेकरिता हि मनाई उचित आहे . ऐतिहासिक महत्व असलेला हा किल्ला अतिशय घनदाट जंगलात आहे ! किल्ल्यास १४ व्या शतकापासूनचा इतिहास आहे . अनेक ऐतिहासिक घराण्यांनी येथे राज्य केले आहे , त्यात निजामशाही -इमादशाही - मुघल शाही - मराठे शाही -इंग्रज राजवट यांचा समवेश येतो !
गडाच्या प्रवेशाला ५ दरवाजे लागतात. शहानुर दरवाजा , मेहंदी दरवाजा पार केल्यावर अतिशय सुंदर असा "महालक्ष्मी दरवाजा " आहे .यावरील सुंदर नक्षीकाम पाहून डोळ्याचे पारणे फिटल्या सारखे झाले .या दरवाजावर फारसी भाषेत एक शिलालेख कोरलेला आहे.
राणी महाल , मसजिद , दिल्ली दरवाजा आणि अनेक पडीक परंतु पुरातन इमारती किल्ल्यावर आहेत !
शक्कर तलाव - राम तलाव -धोबी तलाव असे पाण्याचे साठे असणारे पाणवठे आहेत ! मुख्य अकार्षानापैकी एक अशी प्रचंड मोठी "नऊगजी तोफ " आहे . ही तोफ अष्टधातूची आहे. इमादशहाच्या काळात हि तोफ गडावर आणली गेल्याचे बोलले जाते. तोफेवर पारशीत लेख कोरलेला आहे. जाफराबाद आणि तेलिया वरील बुरुज आणि पाणवठे ही सलामत अस्वथेत आहेत ! लगेच दृष्टीआड गेलेला हरणांचा कळप आणि अनेकविध पक्षी आम्हास किल्ल्यावर दिसले.
अभ्यासकांच्या मते, नरनाळा हे नाव हा किल्ला तसेच परिसरावर राज्य करणारा राजा नरनाळसिंग किंवा नरनाळस्वामी यांच्यावरून पडले असावे. काहींच्या मते नरनाळा हा शब्द तोफ वा बंदुकीशी निगडित असून, वजनाने अत्यंत हलकी तोफ म्हणजे नरनाळ. तिचे अस्तित्व येथे असल्यानेच हा नरनाळा.
वन अधिकारी अतिशय कर्तव्य तत्पर असून खूप उत्तम प्रकारे आमची पडताळणी झाली ! धारधार वस्तू , प्लास्टिक च्या पिशव्या आणि खाद्य पदार्थ अभयारण्यात निषिद्ध आहेत ते पूर्वीच जप्त करण्यात आले आणि किल्ल्याला दिलेल्या भेटी नंतर पुन्हा आम्हाला दिले ! "जंगल सफारी " ची सुविधा ही सरकारकडून उपलब्ध करण्यात आली आहे .
आमचा "पाउल" म्हणून एक हौसी मुलांचा ट्रेकिंग ग्रुप आहे , त्यांसोबत विविध ठिकाणी भेटी देणे नेहमीच आनंददायी असते. भेटी देताना आपोआप किल्ल्याबद्दलचा इतिहास , भौगोलिक परिस्थिती , पर्यावरणीय महत्व , प्रवासाचे नियोजन यांबद्दल माहिती मिळते . गड-किल्ले ह्यांची सफर होतेच त्याच सोबत वन्य पक्षी आणि निसर्गातील वनराईचे पाहून मन हि खुश होते ! "पाउल" सोबत ची नरनाळा भेट ही पण नेहमी प्रमाणेच संस्मरणीय होती ! दुपारच्या जेवणात विविध घरघुती पदार्थांची चंगळ आणि प्रवासातील गप्पा गोष्टी आठवणीत राहण्यासारख्या होत्या.
पुढे जंगल सफारी साठी पुन्हा एकदा भेट जरूर देऊ ते खास तेथील वन्य जीवन पाहण्यासाठी !
महत्वाचे :
* पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही.
* ऐतिहासिक पुराव्यांवरून हा गड 'गोंड राजांनी' बांधला असल्याचे बोलले जाते.
* गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणाला कुत्रा चावल्यास त्याने या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गूळफुटाणे वाहावे व तडक गड उतरावा. तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये, असे मानतात.
* या किल्ल्याला ७ जून, इ.स. १९१६ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.
* नरनाळा अभयारण्यात प्रवेश करण्याची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ आहे. संध्याकाळी ५.०० वाजल्या नंतर नरनाळा अभयारण्यात थांबता येत नाही.
टीम : धवल , तुषार , शशांक , अभिनव , वैशाली , नरेंद्र .